पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७५
स्वराज्य आणि स्वधर्म
 

म्हणतात. आणि ' चातुर्येवीण उंच पदवी कदापि नाही' असे बजावतात. (दास. १४.६) 'श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले.' (दास. १५.१) असा त्यांचा सिद्धांत होता.

राजकारणात बहुतजन
 वारकरी संतांप्रमाणेच परमार्थात, भक्तिमार्गात भेदाभेद मानणे अयुक्त होय. असेच समर्थांचे प्रतिपादन होते. 'ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे । शूद्राचे ब्रह्म ते वोवळे । ऐसे वेगळे आगळे! येथे असेचिना ॥' या मार्गात - 'उंचनीच नाही परी । राया रंका एकचि सरी । जाला पुरुष अथवा नारी । एकचि पद ॥ उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी । ऐसा भेद तयापासी । मुळीच नाही ॥' (दास. ७-२) वर्ण- व्यवस्था, जातिव्यवस्था यांवर समर्थांची श्रद्धा असली तरी, भक्तिमार्गात त्यांचा विचार येता कामा नये, हे इतर संतांच्याप्रमाणे रामदासांनी सांगितलेच. पण आणखी पुढे जाऊन, राजकारणातही हा भेदाभेद नाही, असा सिद्धांत त्यांनी केला. म्हणून 'एक विचारे भरावे सर्व लोक', 'लोक राजी राखावे', 'जनी जनार्दन पहावा', 'कट्ट घालूनि राजकारणा लोक लावी', 'जग तिकडे जगन्नायक', 'राखावी बहुतांची अंतरे' असा घोष त्यांनी चालविला होता. त्यांना जो समुदाव करावयाचा होता, त्यात सर्वांना प्रवेश होता. 'शहाणे करावे बहुत जन' हे याच अर्थाने त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रधर्माचे वैशिष्ट्य ते हेच. 'यारे यारे भलते जन' अशी हाक त्याने ऐहिक ऐश्वर्याच्या मार्गातही, राजकारणातही दिली. कारण समर्थांना राज्य हवे होते ते व्यक्तीचे नसून महाराष्ट्राचे - महाराष्ट्र राज्य हवे होते. हाच राष्ट्रधर्म होय, मूलगामी क्रांती ती हीच. प्रत्येक व्यक्तीला, सामान्यातल्या सामान्य जनालाही चेतना देणे हेच राष्ट्रसंघटनेचे आद्य तत्त्व होय. 'बहुजनास मानला, बहुजनात शोभला', 'सर्वोसि राखणे राजी', 'सर्वत्र वोढती तेथे', 'सर्वासि नीववू जाणे, धन्य तो जाणता गुणी, जनाचे मन हे राखी, युक्तीने काम चालवी'- या वचनांतून समर्थांच्या मनातला हा भावार्थ स्पष्ट होतो. हा भावार्थ मनात असल्यामुळे, म्हणजे राष्ट्रसंघटनेची ही नवी विद्या सर्व जनतेत पेरावयाची असल्यामुळेच, परंपरेने विद्येची उपासना करणारे जे ब्राह्मण त्यांना समर्थांनी या कार्यासाठी आवाहन केले. 'ब्राह्मणी करावा स्वधर्म' असे म्हणताना ब्राह्मणांचा हा स्वधर्म त्यांना अभिप्रेत होता.

सेवकधर्म
 महाराष्ट्र राज्य अथवा स्वराज्य व्हावयाचे तर समर्थांच्या मते राजांनी राजधर्म, क्षत्रियांनी क्षात्रधर्म, ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म आचरणे जितके आवश्यक तितकेच सेवकांनी सेवकधर्म आचरणे हेही आवश्यक होते. म्हणून त्यांनी 'सेवकधर्म' असे दोन