पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७३
स्वराज्य आणि स्वधर्म
 

प्राप्त होतो (दास. १५.२).

शांत वृत्ती
 वाणीच्या या गुणांबरोबरच शांतपणा, विवेक, आर्जवी वृत्ती, मृदू वाणी हे गुणही वक्त्याला अभ्यासावे लागतात. कारण त्याला समुदाय करावयाचा आहे, लोकमानसात क्रांती करावयाची आहे, काही रूढ समज नष्ट करावयाचे आहेत. असे करताना नाना प्रकारचे तुंड, हेकांड आडवे येणारच, विरोधी शक्ती उभ्या राहणारच. त्यांशी शांतपणे, संताप येऊ न देता, मुकाबला करणे अवश्य असते. म्हणून समर्थ म्हणतात, 'उदंड धिक्कारूनि बोलती । तरी चळो नेदावी शांती ॥' निंदा, कठोर ताडण हे सर्व महंताने सोमले पाहिजे. 'जो बहुतांचे सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ॥' म्हणून 'दोष देखोनि झाकावे । अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सापडोनि सोडावे । परोपकार करूनी ॥', 'लोकी बरे म्हणावया कारणे । भल्यास लागते सोसणे । न सोसिता भंडावणे । सहजची होते ॥' एखादे वेळी दुर्जन फारच सतावून सोडतात, त्यांचे बोलणे असह्य होते. अशा वेळी त्याला दुरुत्तरे करण्याऐवजी 'खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मौनचि स्थळ त्याग केला । पाहिजे साधके ॥' जोपर्यंत या महंताचे उत्तम गुण, त्याची योग्यता लोकांना कळत नाही तोपर्यंत असेच धोरण ठेवले पाहिजे. एकदा त्याची योग्यता कळली की 'उत्तम गुण देखता निवळे । जगदांतर ॥' जगदांतर निवळले की विश्वजन ओळखतात. आणि 'जनी जनार्दन वोळला । मग काय उणे तयाला ?'
 सगळ्याचे सूत्र हे आहे. लोक वळणे, लोक वळणे आणि लोकशक्ती संघटित करणे.

ब्राह्मण तरुण
 राष्ट्रधर्माचा प्रसार करण्यासाठी, लोकांना शहाणे करण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदून पैल्याड नेण्यासाठी, तरुणांनी महंत व्हावे, मठ चालवावे आणि समुदाय करावे यासाठी समर्थांनी जे आवाहन केले ते प्रामुख्याने ब्राह्मण तरुणांना. समर्थांची वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था यांवर, वारकरीपंथांच्या संतांप्रमाणेच दृढ श्रद्धा होती. 'वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।' हा सिद्धांत त्यांना मान्य होता. या व्यवस्थेप्रमाणे विद्याव्यासंग करणे, श्रुतिस्मृतींचा, पुराणांचा अभ्यास करणे आणि त्या आधारे लोकांना धर्मोपदेश करणे, कीर्तन, प्रवचन करणे, पुराण सांगणे हा उद्योग ब्राह्मणांचा होता. क्षत्रियांनी क्षात्रधर्म करावा व ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म पाळावा हे सांगताना हा वरील ब्राह्मण धर्म समर्थांना अभिप्रेत होता. म्हणून त्यांनी राष्ट्रधर्माचा लोकांना उपदेश करण्यासाठी ब्राह्मण तरुणांना आवाहन केले. सोयऱ्याधायऱ्यांची मुले लहानपणीच हाती धरून त्यांना पुढे महंत करावे, अशी त्यांची योजना होती, हे मागे सांगितलेच आहे.