पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६५
स्वराज्य आणि स्वधर्म
 


म्लेंच्छसंहार
 आपल्या कार्याच्या प्रारंभी समर्थांनी आपले जे स्वप्न बोलून दाखविले होते त्यातही प्रामुख्याने क्षात्रधर्माचाच उपदेश केलेला आहे. 'त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्य बंदविमोचने । मोहीम मांडीली मोठी । आनंदवनभुवनी ॥ सुरेश उठिला अंगे । शूरसेना परोपरी । विकटे, कर्कशे याने । शस्त्रपाणी महाबळी ॥ कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छ दैत्य बुडावया । कैपक्ष घेतला देवी । आनंदवनभुवनी ॥' या मोहिमेचे फळ काय मिळाले? 'बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळाविले । अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवन भुवनी ॥ बुडाला औरंग्या पापी । म्लेच्छ संहार जाहला ॥' 'मोडली मांडली क्षेत्रे'– फोडलेली देवळे पुन्हा उभारली. आणि 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया.' समर्थांचा यातील अभिप्राय स्पष्ट आहे. मराठ्यांनी संघटित व्हावे, प्रचंड सेना जमवाव्या, मोठमोठ्या मोहिमा काढाव्या आणि म्लेंच्छसंहार करून महाराष्ट्रधर्म वाढवावा, धर्मस्थापना करावी. क्षत्रियांचा क्षात्रधर्म तो हाच ! महाभारतात म्हटलेच आहे की शत्रूचा संहार हाच क्षत्रियाचा धर्म. 'क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिवर्हणात् ।'

राजनीती
  पण क्षत्रियाच्या या बलाला राजनीतीचीही जोड असणे अवश्य असते. या राजनीतीलाच समर्थांनी युक्ती म्हटले आहे. शक्तीलाच प्राधान्य आहे हे खरे. पण शक्ति- युक्ती मिळे जेथे तेथे श्रीमंत नांदती' असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणूनच क्षात्रधर्माप्रमाणेच त्यांनी राजनीतीचाही उपदेश केला आहे.
 भारतात राजनीतीची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वेदांत तिचे प्रतिपादन आहे. महाभारतात तर सविस्तर विवेचन आहे. पुढे चाणक्याचे अर्थशास्त्र, शुक्रनीती, कामंदकीय नीतीसार. इ. ग्रंथांतून या राजनीतीचे विवेचन आढळते. पण दहाव्या शतकानंतर ही परंपरा खंडित झाली. डॉ. पां. वा. काणे यांनी म्हटले आहे की यादवांचे मंत्री हेमाद्री, तत्कालीन इतर पंडित यांसारख्यांनी राजनीतीवर ग्रंथ लिहावयास हवे होते. पण ते व्रतवैकल्ये लिहीत बसले. पुढच्या शास्त्री- पंडितांना धर्म म्हणजे काय हे कळण्याचीच पात्रता नव्हती. मराठा सरदारांना राजधर्म, क्षात्रधर्म यांचा विसरच पडला होता. संत हे ऐहिक ऐश्वर्याविषयी उदासीन होते. त्यांना ते सर्व वमनाप्रमाणे त्याज्य होते, म्हणून त्यांनी राजनीतीचे प्रतिपादन कोठेही केले नाही. त्यांच्या भागवत धर्मात ते कोठेच बसले नसते. सुदैव असे की तो राजधर्म, तो क्षात्रधर्म ती राजनीती सांगणाऱ्या समर्थासारख्या पुरुषाचा महाराष्ट्रात उदय झाला.

अविश्वास
 कोणाचा कधीही विश्वास न धरणे हे सर्व राजनीतीचे सार आहे- 'संक्षेपो नीति-