पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४९
महाराष्ट्रधर्म
 


(३) लोकजागृती
 ऐहिक ऐश्वर्य हवे, वैभव हवे तर त्यासाठी प्रपंच नेटका केला पाहिजे, यशस्वी केला पाहिजे हे खरे. पण प्रपंच, विशेषतः राष्ट्रीय प्रपंच यशस्वी कसा करावयाचा, असा प्रश्न येतो. लोकजागृती, लोकसंघटना, लोकशक्तीची उपासना हा त्यासाठी समर्थांनी मार्ग सांगितला आहे. आणि समर्थांचा अलौकिक द्रष्टेपणा, असामान्य क्रांतिकारकत्व यातच दिसून येते. राष्ट्ररचनेचे मूळ महातत्त्वच त्यांनी जाणले होते हे यावरून स्पष्ट दिसते.

नागरिक
 राजसत्ता या समाजरचनेच्या तत्त्वापेक्षा राष्ट्र हे रचनातत्त्व अगदी निराळे आहे. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबादारी माझ्या शिरावर आहे, असे प्रत्येक व्यक्तीला वाटणे, ही या तत्त्वात पहिली गृहीत गोष्ट आहे. अशा नागरिकांची जी संघटना तिला राष्ट्र म्हणतात. राजसत्तेत असे काही नसते. परराष्ट्र धोरण, शेतीचा विकास, शस्त्रास्त्रांची निर्मिती, उद्योगधंद्यांची प्रगती, समाजशिक्षण यांविषयीची धोरणे राजा व त्याचे मंत्रिमंडळ आणि फारतर काही प्रमुख सरदार हे ठरवितात. प्रजेचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तसा असावा अशी अपेक्षाही नसते. किंबहुना लोकांनी यात काही लुडबूड करू नये, असेच राजाला वाटत असते. याचेच नाव राजसत्ता. प्रजाजनांवर तेथे राजाज्ञा मानण्यापलीकडे कसलीच जबाबदारी नसते. त्यांना जाणीवही नसते. अशा या प्रजाजनांचे नागरिकांत रूपांतर करणे, राष्ट्ररचनेसाठी अवश्य असते. त्या रचनेत सर्व नागरिक राष्ट्रीय प्रपंचाची जबाबदारी घेण्यास सिद्ध असतात. म्हणूनच राष्ट्र ही संघटना फार बलशाली आहे.

मराठा तितुका
 समर्थांनी हे तत्त्व मनोमन जाणले होते. म्हणूनच जनी जनार्दन, जनी जनार्दन हा घोष त्यांनी चालविला होता. त्यांच्या स्वप्नात जे होते ते 'महाराष्ट्र राज्य' होते, कोणा राजाचे राज्य नव्हते. 'मराठा तितुका मेळवावा' असा उपदेश ते करीत, त्यातले रहस्य हेच आहे. राष्ट्र ही लोकसंघटना आहे, हा सिद्धांत त्यांच्या मनात ठाम झाला होता; म्हणून लोकजागृती करून लोकशक्ती संघटित करावयाची, असे त्यांनी ठरविले व सह्याद्रीच्या खोप्यात येताच त्या उद्योगाला त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या राष्ट्रसंघनेच्या उद्योगाचे स्वरूप आता पाहू.

राजकीय असंतोष
 प्रथम त्यांनी राजकीय असंतोष जागृत केला. लो. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. येथे असंतोष या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लोक-