पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८१
मराठा सरदार
 

शहाजी राजांनी आदिलशाहीचा राज्यविस्तार करण्यातच सार्थक मानले. इतिहास - पंडित तर त्यांना विक्रम, शालिवाहन यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानतात. पण त्यांच्या या विधानात आणि त्यांनीच वर्णिलेल्या राजांच्या चरित्रात मेळ बसत नाही.

राजवाडे - विसंगती
 आणि राजवाड्यांच्या बाबतीत तर त्यांच्या स्वतःच्या विधानातच मेळ बसत नाही. कारण, राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत शहाजी राजांचा वरील प्रकारे गौरव केल्यावर, पुढल्या पानात त्यांनीच म्हटले आहे की 'शहाजी राजांची सत्ता शककर्त्याची नव्हती. ती मांडलिकी सत्ता होती.' 'शहाजी राजांना शककर्ता का होता आले नाही ? राजवाडे म्हणतात, 'त्या वेळी लोकांत राष्ट्रभावना नव्हती. स्वराज्य करण्याची उत्कट इच्छा ज्या समाजात नाही त्याला राष्ट्र म्हणता येत नाही. राज्य करण्याची प्रबल इच्छा व तत्प्रीत्यर्थ प्राणही वेचण्याची तयारी, त्या काळी, फक्त एकट्या शहाजीच्या व त्याच्या काही ब्राह्मण मुत्सद्द्यांच्या ठायी तेवढीच होती. बाकी सर्व समाज निश्चेष्ट होऊन पडला होता.'

विपरीत विधाने
 ही विधाने अत्यंत विपरीत व इतिहास पंडिताला न शोभेशी आहेत. राष्ट्रभावना नेता निर्माण करतो. म्हणूनच तो नेता होतो. दुसऱ्या कोणी राष्ट्रभावना निर्माण करावयाची आणि मग नेत्याने लढाई करावयाची, असा का प्रकार आहे ? शिवछत्रपतींनी असे मानले असते तर हिंदवी स्वराज्य कधीच साकार झाले नसते. ते प्रारंभापासूनच साहसाने, प्राणार्पणाची तयारी करून, मुस्लिम सत्तेच्या विरुद्ध उभे ठाकले आणि त्यामुळेच लोकांत राष्ट्रभावना निर्माण झाली आणि ते प्राणार्पणास सिद्ध झाले. शहाजी राजे असे उभे ठाकले असते तर तेव्हाच ती निर्माण झाली असती.

तिहेरी शक्ती
 (३) आणि खेदाची गोष्ट अशी की तशी राष्ट्रभावना निर्माण झाल्यावरही शहाजी राजे आदिलशहाचा आश्रय सोडून देऊन छत्रपतींच्या उद्योगात सामील झाले नाहीत. १६४८ साली राजे कैदेत पडले. त्यानंतर बंगलोर आणि कोंडाणा (सिंहगड) दोन्ही ठाणी हस्तगत करण्यासाठी आदिलशहाने फौजा पाठविल्या. पण कर्नाटकात बंगलोरला राजांचे वडील पुत्र संभाजी यांनी त्यांच्यावर आलेल्या फर्हादखानाचा मोड केला आणि धाकटे पुत्र शिवछत्रपती यांनी पुरंदरच्या लढाईत विजापूरच्या मुसेखानास ठार मारले व त्याचे लष्कर उधळून लावले. दोन पुत्रांचा पराक्रम पाहून कैदेतून सुटताच शहाजी राजे आपल्या सर्व सरंजामानिशी जर या महारथी पुत्रांना सामील झाले असते तर एकदोन वर्षातच हिंदवी स्वराज्याची आकांक्षा सर्व महाराष्ट्रभूमीत साकार