पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२७२
 


मुस्लिमांचे आधारस्तंभ
 फलटणचे निंबाळकर हे असेच पराक्रमी होते. हे मूळचे धार येथील. पवार (परमार) या घराण्यातील एक पुरुष निंबराज हा दक्षिणेत आला. त्याचे वडील जगदेवराव तथा धारापतराव यांनी महंमद तबलखाच्या लष्करात, दुराणी लोकांशी लढून, मोठा पराक्रम केला, म्हणून सुलतानाने त्यास फलटणजवळ साडेतीन लक्षांची जहागीर दिली व नाईक हा किताब दिला. हा निंबराज १३४९च्या सुमारास दक्षिणेत आला. त्याच वेळी हसन गंगू दक्षिणेत आला. त्याने महंमद तबलखाची सत्ता झुगारून देऊन दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. निंबराजांनी असे का केलं नाही ? त्यांना मोठी जागीर मिळाली होती. (दुराणी) अफगाण लोकांनाही पराभूत करावे असा पराक्रम त्यांच्या रक्तात होता. पण त्यांनी जहागिरीतच संतोष मानला. प्रथम बहामनी राज्यात व पुढे आदिलशाहीत निंबाळकर मोठे मनसबदार झाले. १५७० साली जहागिरीवर आलेला वणंगपाळ फार पराक्रमी होता. विजापूरचे वजीरही त्यास वचकून असत. 'राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ' अशी त्यांच्याबद्दल म्हण पडली होती. पण हा पराक्रम, हे शौर्यधैर्य मुस्लिमांच्या सेवेत खर्ची पडत होते. त्यांच्या राज्याचा ते विस्तार करीत होते. त्याचा ते आधारस्तंभ होते.

घाटगे
 घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही.

ब्राह्मण गुरू
 घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्याने खटावप्रांती श्रीरामेश्वर मंदिरात मोठे अनुष्ठान