पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३.
मराठा सरदार
 



तीन वर्ग
 बहामनी कालातील राजसत्तेचे - सुलतान सत्तेचे स्वरूप कसे होते, याचा येथवर विचार केला. आता या कालातील महाराष्ट्रीय हिंदुसमाजाचे जे नेते होते त्यांच्या कर्तृत्वाचे विवेचन करावयाचे आहे. या कालाचा इतिहास पाहताना, या नेत्यांचे तीन प्रमुख वर्ग डोळ्यांपुढे येतात. त्या काळातले मराठा सरदार हा पहिला वर्ग. निंबाळकर, सावंत, सुर्वे, शिरके, माने, घाटगे, यादव, भोसले असे अनेक मराठा सरदार या काळात पराक्रम करताना दिसतात. नेत्यांचा दुसरा वर्ग म्हणजे शास्त्री पंडितांचा. या काळातले धर्मशास्त्रज्ञ हे मागे सांगितल्याप्रमाणे टीकाकार व निबंधकार होते. भारतात स्वतंत्र स्मृती रचण्याची परंपरा कधीच लोपली होती. आठव्या शतकानंतर एकही नवी स्मृती रचली गेली नाही. या पुढल्या काळात धर्मशास्त्रज्ञांनी मनू, याज्ञवल्क्य, नारद, पराशर यांच्या स्मृतींवर फक्त टीका लिहिल्या. आणि त्यानंतरच्या काळात अनेक जुन्या स्मृती, पुराणे, धर्मसूत्रे यांच्यांतील वचने घेऊन शास्त्रीपंडित धर्मग्रंथ रचू लागले. बहामनी काळात महाराष्ट्रात नृसिंहप्रसादकर्ता दलपती, निर्णयसिंधू व शूद्रकमलाकर यांचा रचयिता कमलाकर भट्ट, व्यवहारमयूखकर्ता नीलकंठ भट्ट, स्मृतिकौस्तुभकर्ता अनंत देव, असे धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. नेत्यांचा तिसरा वर्ग म्हणजे संतांचा होय. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास हे पाच प्रसिद्ध संत या काळात होऊन गेले हे सर्वश्रुतच आहे.