पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२२८
 


भानुभट
 पद्य ग्रंथांमध्ये भास्कर कविव्यास किंवा भानुभट याचा 'शिशुपालवध' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यात प्रामुख्याने श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या शृंगाराचे वर्णन असून शिशुपाळवधाला १०२७ ओव्यांपैकी जेमतेम २०० ओव्या दिलेल्या आहेत. कवीचा गुरुबंधू भावे देवव्यास याने त्यावर टीका केली की 'ग्रंथ निका जाहला; परी तो निवृत्ता जोगा नव्हेचि. शृंगारिया प्रवृत्ता जोगा जाहला.' हे ऐकून मग भास्कराचार्यानि 'एकादश स्कंध' ही भागवताच्या अकराव्या स्कंधावर टीका लिहिली. हा ग्रंथ १२७६ साली लिहिलेला असून त्याच्या ८२७ ओव्या आहेत. वि. ल. भावे यांच्या मते एकनाथांच्या ग्रंथाची सर याला नाही. कवीची टीका तुटपुंजी व त्रोटक वाटते. शिशुपाळवधात शृंगाराचा अतिरेक आहे तर यात वैराग्याचा. दामोदर पंडिताचा 'वत्सहरण' हा काव्यग्रंथ महानुभावांना फार प्रिय आहे. वत्सहरण या भागवतातील कथेवर हे ५०० ओव्याचे काव्य आहे. यात वृंदावन, कालिंदी, श्रीकृष्णाचे रूप यांचे उत्तम वर्णन आहे. भक्ती हा यातील मुख्य रस आहे. नरेन्द्र या कवीचे 'रुक्मिणी स्वयंवर' हे काव्य सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. यातील अलंकारवैभव, कल्पनाप्राचुर्य, वर्णनशैली अनेकांच्या मते अप्रतिम आहे.

ज्ञानप्रबोध
 विश्वनाथ बाळापूरकर यांचा 'ज्ञानप्रबोध' हा पद्य ग्रंथ तत्त्वज्ञानविषयक आहे. गीतेच्या १३ व्या अध्यायातील अमानित्वादी जी ज्ञानाची लक्षणे त्यांवर ही टीका आहे. यात ज्ञानेश्वरीतील शेकडो वाक्यार्थे जशीच्या तशी घेतली आहेत. याची रचना १३३१ साली झाली. 'ऋद्धिपूर वर्णन' हा नारायणपंडित व्यास तथा नारो बहाळिये याचा ग्रंथ असून त्यात ऋद्धिपूर हे जे महानुभावांचे आदिपीठ त्याचे वर्णन आहे. त्यातून कवीची गुरुभक्ती उत्कटत्वाने प्रगट होते. 'सैहाद्रि वर्णन' हा ग्रंथ राघवो पाध्ये तथा रवळोबास याने रचला असून, त्यात महानुभावांच्या एकमुखी दत्ताचे लीळा-चरित्र वर्णिले आहे. याच्या एकंदर ७२९ ओव्या असून तो इ. स. १३३२ साली रचलेला आहे.

ढवळे
 चक्रधराची एक शिष्या महदंबा हिने श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केल्या आहेत. त्या काव्याला 'ढवळे' म्हणतात. पंथात या ढवळ्यांना फार मान आहे. ही मुख्यतः रुक्मिणी हरणाची कथा असून ती श्रीकृष्णभक्तीने भरलेली आहे.
 याशिवाय प्रश्नावली, नामाचे ठाय, मूर्तिज्ञान, पूजावसर (भावे देव व्यास) मूर्तिप्रकाश, (केशवराज सूरी) स्मृतिस्थळ, श्रीकृष्ण चरित्र असे महानुभावांचे वाङ्मय आहे.