पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१५४
 


वेद-परंपराभिमान
 हा अभ्यास सुरू करताच पहिली गोष्ट आपणास दिसून येते ती ही की सातवाहनां पासून यादवांपर्यंत जी सहा राजघराणी दीड हजार वर्षेपर्यंत महाराष्ट्रावर राज्य करीत होती ती सर्व सनातन वैदिक धर्माची व परंपरेची पूर्ण अभिमानी होती. सातवाहनांचा पहिला मोठा सम्राट शातकर्णी याने दोनदा अश्वमेध यज्ञ केला व शिवाय पौडरिक, अन्वरंभणीय, दाशरात्र इ. सोळा यज्ञही केले. या सर्व यज्ञांत त्याने ब्राह्मणांना धेनू, भूमी, सुवर्ण यांचे विपुल दान दिले. या कुळातील शेवटचा मोठा राजा यज्ञश्री यानेही अश्वमेध यज्ञ केला होता. या कुळातील सर्वश्रेष्ठ सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी हा चातुर्वर्ण्याचा व ब्राह्मणांचा अभिमानी म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. या राजांचे शिलालेखांत वर्णन करताना ते राम, कृष्ण, अर्जुन, भीम यांसारखे पराक्रमी होते, असे म्हटलेले आढळते. जनमेजय, सगर, ययाती, अंबरीष या परंपरेत त्यांना नेऊन बसविलेले दिसते. या सम्राटांची नावे पाहिली तरी ती कृष्ण, गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र, कर्ण, लंबोदन, शिवश्री, यज्ञश्री अशी सनातन परंपरेतलीच आढळतात. ते स्वतःला ' आगमानां निलय:' असे म्हणवितात; यामुळे त्यांच्या सनातन वैदिक धर्माच्या परंपरेच्या अभिमानाविषयी कसलीच शंका राहात नाही.

जैन-बौद्ध प्रभाव ?
 सातवाहनांच्या लगत आधी अशोकाचे साम्राज्य सर्व भारतावर - आणि अर्थात महाराष्ट्रावरही — पसरलेले होते. त्याने राजसत्तेच्या बलाने भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला होता. अशोक इ. स. पूर्व २३६ या साली मृत्यू पावला. आणि सातवाहनांच्या साम्राज्याची स्थापना त्याच वेळी झाली. असे असूनही त्यांच्या साम्राज्यात बौद्धांना सहिष्णुतेने वागवून त्यांच्या विहारांना उदार आश्रय देण्याखेरीज बौद्ध धर्माचा कसलाही प्रभाव दिसत नाही. बौद्धांनी व जैनांनी वेदाविषयीची पूज्य बुद्धी नष्ट केली होती, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व अमान्य केले होते, सनातन परंपरेतील थोर पुरुष आमच्याच परंपरेतील आहेत असा प्रचार केला होता. वेदांतील प्रथम राजर्षी ऋषभ हा आमचा पहिला तीर्थंकर आहे, असे जैन म्हणत होते. दाशरथी राम हा बुद्धाचा पूर्वजन्मीचा एक अवतार, असे बौद्ध प्रतिपादन करीत होते. श्रीकृष्णाविषयी त्यांना अत्यंत तिरस्कार होता. तो नरकात जाईल व जैन धर्माचा स्वीकार केल्यावर त्याचा उद्धार होईल, असे अरिष्टनेमी या जैन धर्मवेत्त्याने त्याला सांगितले होते. यज्ञयाग, चातुर्वर्ण्य यांची तर जैन, बौद्ध अतिरिक्त निंदा करीत. अहिंसेचे तर ते स्वतःला आद्य प्रणेते म्हणवीत ( महाभारतात - उपसंहार पृ. १८, १९ ). पण याचा कसलाही परिणाम महाराष्ट्रावर झालेला दिसत नाही. बौद्ध-जैनांनी निंदिलेली सर्व धर्मांगे व सर्व थोर पुरुष सातवाहनांनी शिरसावंद्य मानिली होती हे मागील वर्णनावरून ध्यानात येईल.