पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८.
धार्मिक जीवन
 



महत्त्व
 गेल्या दोन प्रकरणांत महाराष्ट्रातल्या राजशासनाचे अथवा दण्डनीतीचे विवेचन केल्यावर आता येथील धार्मिक जीवनाचा विचार करावयाचा आहे. प्राचीन काळी सर्व जगात, सर्व देशांत धर्म हा लोकांच्या संस्कृतीचा मूलाधार होता. राजशासना वाचून संस्कृती जगू शकत नाही, समर्थ राजसत्तेच्या अभावी देश परकी आक्रमणास बळी पडून त्याच्या अस्मिता व तिच्याबरोबरच त्याची संस्कृती लयास जाते, म्हणून संस्कृतीच्या इतिहासात राजशासनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे खरे. पण संस्कृतीला खरा प्रारंभ धर्मविचारापासून होतो हे आपण विसरून चालणार नाही. प्राचीन काळचा इतिहास पाहता असे दिसते की काव्य, तत्त्वज्ञान, विद्या, कला यांचा जन्म धर्मप्रेरणेतूनच झाला आहे. यामुळे धर्माची सत्ता त्या काळी सर्वंकष होती, सर्वव्यापी होती. म्हणून संस्कृतीच्या इतिहासात धर्मविचाराला प्रथम स्थान दिलेच पाहिजे.

तीन अंगे
 तत्त्वज्ञान, नीती आणि आचार ही धर्माची तीन अंगे होत. आत्मा, परमात्मा व जग किंवा जीव, शिव आणि सृष्टी यांच्या स्वरूपाविषयीचे जे सिद्धान्त ते तत्त्वज्ञान होय. सांख्य, योग, वेदान्त हे तत्त्वज्ञानाचे पंथ होत. नीतीमध्ये सत्य, अहिंसा, दया, परोपकार, सर्वभूतहित, इंद्रियनिग्रह, मातृपितृभक्ती यांचा समावेश होतो. आणि यज्ञ- याग, होमहवन, स्नानसंध्या, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, गंधभस्मलेपन, सोवळे-ओवळे, उपासतापास हा सर्व आचारधर्म होय. धर्माच्या या तीन अंगांवरून कोणत्याही समाजाचे धार्मिक जीवन कळून येते.