पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
११०
 


सम्राट सिंघण
 भिल्लम पाचवा हा देवगिरी यादवांचा पहिला सम्राट ( ११४७-९१). या घराण्यातील सर्वांत श्रेष्ठ सम्राट सिंघण हा होय (इ. स. १२१०-१२४७ ). त्याच्या आधी भिल्लम व त्याचा पुत्र जैत्रपाल यांनी गुजराथ, माळवा, आणि कोकण हे प्रांत जिंकले होते. होयसळ यादव आणि वरंगळचे काकतीय राजे यांशीही त्यांच्या अनेक झटापटी झाल्या. पण त्यांतून फलनिष्पत्ती काही झाली नाही. जैत्रपालाच्या कारकीर्दीतच मुकुंदराज हा प्रसिद्ध संतकवी होऊन गेला. त्याने आपला 'विवेकसिंधु' हा ग्रंथ जैत्रपालासाठीच लिहिला, असे म्हणतात. या जैत्रपाल तथा जेतुगी याचा मुलगा सिंघण त्याच्या मागून देवगिरीच्या सिंहासनावर इ. स. १२१० साली बसला. यानेच यादवांच्या साम्राज्याचा विस्तार चारी दिशांना केला. प्रारंभीच त्याने होयसळ यादवांवर मोहीम सुरू केली व ती पाच वर्षे चालवून कर्नाटकावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. नंतरच्या दोन वर्षांत त्याने कोल्हापूरच्या शिलाहारांना जिंकून त्यांचे राज्य साम्राज्यात सामील करून टाकले. या वेळचा शिलाहार राजा भोज याचीही होयसळ, काकतीय व यादव यांच्याप्रमाणेच स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याची आकांक्षा होती. पण सिंघणाच्या पराक्रमामुळे ती सिद्धीस गेली नाही. सिंघणाने नंतर आपला मोर्चा माळवा, गुजराथ आणि लाट (दक्षिण गुजराथ) यांकडे वळविला. सर्वत्र त्याला यशच येत गेले, आणि त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले. काकतीय, होयसळ, चालुक्य (गुजराथ) व परमार (माळवा) हे सर्व त्याच्यापुढे हतप्रभ झाले व त्याला त्यांनी सम्राट म्हणून मान्यता दिली.

दूरदृष्टीचा अभाव
 सिंघणाचे हे विजय भूषणास्पद असले तरी त्यासंबंधी विचार करताना मनात एक शल्य राहते. या वेळी दिल्लीला मुस्लिम सत्ता स्थापन झाली होती व माळवा आणि गुजराथ या प्रदेशांवर मुस्लिमांच्या धाडी सारख्या येत होत्या. त्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य चालुक्य व परमार यांना नव्हते. अशा वेळी सिंघणाने त्यांशी सख्य जोडून एक बलिष्ठ संघ सिद्ध केला असता तर दिल्लीची मुस्लिम सत्ता उखडून टाकणे त्यांना अशक्य नव्हते. पण असा सुविचार, ही दूरदृष्टी भारतीय सत्तांना त्या वेळी तर नाहीच, पण पुढील अनेक शतकांतही प्राप्त झाली नाही. सिंघणाच्या घराण्याला त्याचे परिणाम भोगावे लागलेच. पुढील पाऊणशे वर्षांतच यादव घराणे दिल्लीच्या मुस्लिम सत्तेने नष्ट करून टाकले.

कृष्णछाया
 सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण, त्याचा भाऊ महादेव व नंतर कृष्णाचा पुत्र रामचंद्र हे यादवराजे क्रमाने गादीवर आले. त्यांनी अर्थातच गुजराथ, माळवा, होय-