पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
९४
 

मूळपुरुष विंध्यशक्ती हा एक ब्राह्मण होता हे वर सांगितलेच आहे. त्याचा मुलगा प्रवरसेन हा या घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता नृपती होय.
 इतिहासाविषयी भारतात प्राचीन काळापासून अगदी अक्षम्य अनास्था होती हे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीपर्यंत वाकाटक या वंशाचे नावही कोणाला माहीत नव्हते. १८३६ साली सिवनी येथे या घराण्यातील राजा द्वितीय प्रवरसेन याचा एक ताम्रपट सापडला, तेव्हा वाकाटक हे नाव प्रथम ज्ञात झाले. परंतु त्यानंतरही तीस- चाळीस वर्षे, हे कोणी परकी यवन ग्रीक घराणे असावे, असाच पंडितांचा समज होता. यांच्या काळाबद्दलही असेच गैरसमज होते. बुल्हर, फ्लीट कीलहॉर्न यांच्या मते वाकाटक हे पाचव्या किंवा आठव्या शतकात होऊन गेले. पण १९१२ साली पुण्याला एका तांबटाच्या घरी वाकाटकनृपती द्वितीय रुद्रसेन याची पट्टराणी, प्रसिद्ध सम्राट महाराजाधिराज द्वितीय चंद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा एक ताम्रपट सापडला. त्यानंतर हळूहळू त्यांचे अनेक ताम्रपट सापडले. अजंठा येथील क्र. १६, १७ व १९ या लेण्यांतील त्यांचा इतिहास देणाऱ्या कोरीव लेखांचे वाचन नीट झाले. द्वितीय प्रवरसेन व सर्वसेन या वाकाटक राजांनी लिहिलेली 'सेतुबंध' व 'हरिविजय' ही महाराष्ट्री प्राकृतातील काव्ये उपलब्ध होऊन त्यांचे कर्तृत्वही निश्चित झाले आणि मग हे सर्व साहित्य घेऊन संशोधक पंडित त्यांचा इतिहास लिहू लागले. डॉ. कृष्णस्वामी आय्यंगार, डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांनी या राजघराण्याविषयी आपल्या ग्रंथांत बरेच विवेचन केले आहे. अगदी अलीकडे म. म. मिराशी यांनी 'वाकाटकनृपती आणि त्यांचा काल' हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. पुढील माहिती प्रामुख्याने त्याच्याच आधारे दिली आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल', भारतीय विद्याभवन, खंड २ व ३ आणि 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन', संपादक डॉ. राजदानी- या ग्रंथांचाही आधार घेतला आहे.
 विंध्यशक्ती (इ. स. १५५ - २७५ ) हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होय. अजंठ्याच्या लेखात त्याची अत्युक्तीने स्तुती केली आहे. पण तीवरून ऐतिहासिक अशी कसलीच माहिती मिळत नाही. तो वाकाटक वंशकेतू होता एवढेच तीवरून समजते. विदर्भाचा बराच भाग त्याच्या राज्यात असावा असे मिराशींचे अनुमान आहे. विंध्यशक्तीचा पुत्र प्रवरसेन हा फार पराक्रमी होता. त्यानेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र हे प्रदेश जिंकून वाकाटक घराण्याच्या साम्राज्याची स्थापना केली. त्याने चार वेळा अश्वमेध यज्ञ केले असे त्यांच्या वंशजांच्या बहुतेक ताम्रपटात वर्णिलेले आहे. त्यावरून त्याच्या पराक्रमाची कल्पना येते. इतरही अनेक श्रौतयाग याने केल्याचे उल्लेख सापडतात. वाजपेय यज्ञाच्या अनुष्ठानानंतर त्याने सम्राट ही पदवी धारण केली.