पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. सयाजीरावांनी १९०४ मध्ये फुलेंच्या मागणीला सुसंगत असा 'बालविवाह प्रतिबंधक कायदा' केला. या कायद्यात महाराजांनी फुलेंच्या पुढे जाऊन वधू-वर पक्षाबरोबर बालविवाह लावणाऱ्या भटजीलासुद्धा दंड आणि शिक्षेची तरतूद केली. सायाजीरावांचे हे धोरण प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या सोडवणुकीसाठी किती कठोर पाऊल उचलता येऊ शकते याची साक्ष देणारे आहे.
 भारतीय महिलांच्या उत्कर्षाचा मार्ग असणाऱ्या परंतु त्यासाठी महिलांबरोबरच स्वत: बाबासाहेबांनाही संघर्ष कराव्या लागलेल्या हिंदू कोड बिलातील सर्व ६ कायदे सयाजीरावांनी १९०५ ते १९३३ दरम्यान बडोद्यात लागू केले होते. भारतीय राज्यघटनेत या विषयाची चर्चा सुरू होण्याअगोदर ४५ वर्षे बडोद्यात हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी सुरू झाली होती. तर उर्वरित भारतातील हिंदू महिलांना जे हक्क मिळायला ६०-७० वर्षे संघर्ष करावा लागला ते हक्क बडोद्यातील स्त्रियांना उर्वरित भारतातील हिंदू स्त्रियांच्या अगोदर ११५ वर्षे मिळाले होते.

 बडोदा संस्थानात हिदू विवाह कायदा १९०५ मध्ये करण्यात आला. या कायद्यात हिंदू लग्नाच्या मूलतत्त्वांची व्याख्या करून, कायदेशीर लग्नाच्या अवश्य गोष्टी, स्त्री-पुरुषांचे परस्पर हक्क, त्यांचे मिळकतीवरील अधिकार, एकमेकांबद्दलची जबाबदारी व लग्न संबंधाची अविछीन्नता या सर्व गोष्टी निश्चित करण्यात आल्या. हिंदू विवाह कायदा करणारे बडोदा हे ब्रिटिश भारत आणि ५६५ संस्थानातील पहिले संस्थान होते.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २२