भाऊरावांना सन्मानाने मंडपात आणण्यासाठी त्यांनी राजरत्न आर. एस. माने-पाटील यांना पाठवले. माने-पाटलांसोबत सन्मानाने आत जाऊन भाऊरावांनी सयाजीरावांना मानपत्र अर्पण केले. सयाजीरावांच्या मनात भाऊराव आणि त्यांचे कार्य याविषयीचा असणारा आदर या प्रसंगातून अधोरेखित होतो.
मुंबईतील भेट
सयाजीरावांनी १९३३ ला छत्रपती शाहू बोर्डिंगला भेट देण्याआधीपासूनच भाऊराव सयाजीरावांच्या संपर्कात होते असे दिसते. १९३६ च्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या भेटीनंतर भाऊराव आणि सयाजीरावांच्यात पत्रव्यवहार असण्याची शक्यता अधिक आहे. कारण सयाजीरावांनी १९३७ मध्ये युरोपच्या दौऱ्यावरून परतत असताना इजिप्तमधील जिबुटी बंदरातून २६-११-१९३७ रोजी भाऊरावांना तार करून मुंबईत भेटण्यासाठी बोलावले. या मुंबई भेटीत भाऊरावांनी स्वावलंबी तत्त्वावर शाळा व वसतिगृह सुरू करून मोफत शिक्षणाची सोय करण्याची कल्पना मांडली. या कल्पनेनुसार मुलांनी रोज २ तास शारीरिक श्रम करून त्याबदल्यात माध्यमिक शिक्षण मोफत घ्यावे अशी ती योजना होती. महाराजांना ही योजना आवडली. त्यांनी ही शाळा व संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने ४,००० रु.ची मदत दिली. या मदतीतून जमनाबाई गायकवाड शिष्यवृत्ती सुरू झाली. भाऊरावांच्या अपेक्षेपेक्षा