बहुतेक त्यामुळेच भारतातील कोणत्याही चळवळीचे ते 'आयकॉन' होऊ शकले नसावेत. मे १९४८ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या २८ व्या अधिवेशनापासून अधिवेशनाचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांच्या भाषणात सयाजीरावांना वगळून केवळ शाहू महाराजांचा 'जयघोष ' सुरू झाला. याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची किनार होती. या वादाने अकारण ब्राह्मणद्वेषाची चळवळ गतिमान केली. त्याचे परिणाम आज स्पष्ट दिसत आहेत. या सर्व घटनांच्या एकत्रित परिणामातून झालेली कोंडी फोडायची असेल तर सयाजीरावांच्या धोरणातील सकारात्मकता आणि सर्वसमावेशकता हाच एकमेव उपाय आपल्यासमोर उरतो. मराठा जातीच्या उत्कर्षासाठी सयाजीरावांनी प्रचंड काम करूनसुद्धा त्यांच्यावर मराठा जातीयवादाचा आरोप का करता येत नाही याचे उत्तर महाराजांच्या वर उद्धृत केलेल्या भाषणात सापडते.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे उद्गाते असणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची महाराष्ट्राने योग्य नोंद घेतली नाही. त्यांच्या धोरणांचा संस्कार यशवंतराव चव्हाणांचा अपवाद वगळता आपल्या राज्यकर्त्यांना महत्त्वाचा वाटला नाही. कारण आपल्या बुद्धिजीवींनी आपल्या ऊर्जादायी इतिहासाची