पान:महाबळेश्वर.djvu/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११२ )



 भाताची जमीन-ही नांगरानें कोरडेपणी व ओलेपणी मोखर करावी लागते; नंतर तींत पाणी सोडून गरगरीत चिखल तयार झाल्यावर तें पाणी बंद ठेवून त्यावर पाठाळ (लेव्हल) फिरवून साफ करितात. मग पुरुष, बायका, मुलें चिखलानें रबरबीत झालेल्या जमिनीत शिरून व रोपांच्या ढिगांतून गांठीं मारलेल्या गुंडाळ्या घेऊन एका हारींने रोपें खोंवीत जातात. तीं इतक्या बिनचूक रीतानें जलद खोंवीत जातात की, त्यांच्या रांगामध्यें दोरी धरल्याप्रमाणें समांतर जागा राहते. एक खंडीचे बारोली पीक होण्यास सुमारें ९० पायली भाताचीं रोपें तयार करावीं लागतात. पुढें उन्हाची साधारण ताप पडली ह्मणजे एकदां भातशेत बेणून किंवा भांगलून घेतात. ही बेणणी झाली ह्मणजे रोपांच्या वाढीस जास्त जोर लागून पीक लौकर तयार होतें आणि भाताच्या पिकाचे जून दांडे भाताच्या लोंबांतील किंवा कणसांतील तांदुळाच्या जडत्वामुळे जमीनीवर आडवे पडतात. तेव्हां शेत पिंवळे रंगाचें दिसू लागतें. याप्रमाणें साळी (भात) चें पीक तयार झाल्यावर सारवलेल्या जाग्यांत तें झोडून भात काढून