________________
ते ध्यान उभे विटेवरी' असे म्हणणारे भक्त 'मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला' अशा संतत्वाच्या अनुभवाच्या पायरीला पोहोचल्याचेही आपण पाहतो. व्यवहारात दिसणारी मूर्तिपूजा हा प्रारंभ आहे. अंतिमतः दयानंदांनी सांगितलेल्या निराकार परंतु सगुण व निर्गुण परमेश्वराच्या सत्य स्वरूपाकडेच जायचे आहे. असा समन्वय बुद्धिभेद व मनोभेद करायचा नाही म्हणून करावा लागतो. (महर्षी दयानंदांना व आर्य समाजाला मात्र असा समन्वय मान्य नाही . समन्वय करण्यासाठी दयानंदांनी आपल्या वेदोक्त तत्त्वांना मुरड घातली नाही. उलट मूर्तिपूजेच्या विरोधासाठी त्यांनी अत्यंत कष्ट सहन केले. समन्वयाची भूमिका जर आढळली, तर ती या पुस्तिकेच्या संकलकाची आहे.) दयानंदांना मूर्तिपूजा मान्य नसली तरी सजीव देवांची पूजा करण्याचा पुरस्कार ते करतात. आई, वडिल, आचार्य, अतिथी आणि पती-पत्नींसाठी परस्पर या पाच देहधारी देवांच्या संगतीने मनुष्यदेहाची उत्पत्ती, पालन, सत्यशिक्षण, विद्या व सत्यउपदेश हे मिळतात. या सजीव देवांची सेवा आणि सत्कार करणे हीच पूजा व उत्पत्तीपासून सत्योपदेश याच परमेश्वर प्राप्तीच्या पायऱ्या असे दयानंद म्हणतात. दयानंद जसे मूर्तिपूजेच्या विरुद्ध आहेत तसेच मंदिरे, आश्रम, नद्या, तलाव इ. स्थळांना तीर्थ मानून अशा तीर्थांच्या तीर्थयात्रा करण्याच्याही विरोधात आहे. 'जे तारून नेते ते तीर्थ' अशी त्यांची तीर्थाची व्याख्या आहे. उत्तम गुण आणि उत्तम कर्म ही दुःखातून तारणारी असल्यामुळे शुभ गुण-कर्मे हीच तीर्थे असे दयानंद म्हणतात. __ मूर्तिपूजा किंवा जलस्थलांच्या तीर्थयात्रा दयानंदांना मान्य नसल्या तरी परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी स्तुती, प्रार्थना व उपासना हे तीन प्रकार मात्र त्यांना मान्य आहेत व त्यांचा पुरस्कार त्यांनी केला आहे. परमेश्वराच्या गुणांचे स्मरण करत, त्यांचे वर्णन करत, ते गुण आपल्यामध्ये आणणे ही परमेश्वराची स्तुती आहे. या स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रेम निर्माण होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून मग संकल्पपूर्तीसाठी परमेश्वराची प्रार्थना करणे यामुळे निरभिमानता म्हणजे नम्रता निर्माण होते. परमेश्वराबद्दल प्रेम वाढणे आणि स्वतःबद्दलचा अहंकार कमी होणे या दोन गोष्टी स्तुती व प्रार्थनेने झाल्यावर मग ईश्वराची उपासना करता येते. अष्टांग योगाने समाधी अनुभवणे हीच उपासना. स्तुती, प्रार्थना व उपासना या तीन्ही गोष्टी आयुष्यभर चालू ठेवाव्यात असे दयानंदांचे मत आहे. महर्षी दयानंद काय म्हणाले ?