म्हणजे "जिकडे हात तिकडे दृष्टि, जिकडे दृष्टि तिकडे मन, जिकडे मन तिकडे भाव, जिकडे भाव तिकडे रस " असा प्रकार असावा. तसेंच :-
कंठेनालंबयेद्गीत हस्तेनार्थे प्रदर्शयत् ।
चक्षुर्भ्यां दर्शयेद्भावं पादाभ्यां तालमाचरेत् ॥
गळ्यानें गावें, हातानें अर्थ दाखवावा, डोळ्यानें मनोभिप्राय कळवावा आणि पायांनीं ताल सुचवावा."
इंदुप्रकश—ता. ४।८।०२
नटास उपदेश -अनंत वामन बर्वे.
सध्या उर्दू व पार्शी चालीवर फार भर आहे. याकरितां या चालीविषयीं थोडें लिहिणें आवश्यक दिसतें. या चाली सर्वच चांगल्या किंवा वाईट आहेत असें नाहीं. विषयानुरूप पद्यांच्या चालीची योजना केल्यास जुन्या चालींचा एकसुरीपणा किंचित् कालपावेतों दूर होऊन विविधत्व येतें. पण या चालींची योजना फार सावधगिरीनें झाली पाहिजे. बहुतेक पाशी व उर्दू चाल उडत्या व एकतारी असतात; नव्या असेपर्यंत आवडतात, नंतर लवकरच त्यांचा वीट येऊं लागतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. 'ऊठ ऊठ,' 'बैस बैस' अशा प्रकारचे शब्द घातलेला माधुर्यहीन चालीवरची कविता फार दिवस टिकून लोकप्रिय होणें कसें बरें संभननीय असेल? याकरितां असलेल्यांत निवड करून भारदस्तपणाचा अंश जास्त असलेल्या चाली प्रसंगानुसार ज्या ठिकाणीं घातलेल्या आढळून येतात त्या ठिकाणीं त्या चांगल्या शोभल्याचेंही दिसून येतें. पण हल्लींचे पुष्कळ कवि केवळ नव्या चाली म्हणून सरसकट मिळेल त्या चालीचा उपयोग करितात. यामुळेंच या नवीन चालींची लोकप्रियता आतां दिवसेंदिवस थोडथोडी कमी होत चालली आहे; व जुन्या चालीकडे फिरून लोकांचा कल जात आहे. हा प्रत्याघात झाल्यामुळें नाटकांतील