Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३८
मराठी रंगभूमि.

वून ठेवलें होतें तें आतां बऱ्याच रीतीनें चवाट्यावर आलें आहे; व ते जर प्राकृत लोकांशी मन मोकळें करून वागतील तर गायनाची फिरून कदाचित् भरभराट होईल. गायनकलेचे पूर्वीच्या वैभवाचे दिवस गेले हे खरें आहे; परंतु आपणांतली अशी कोणती कला आहे कीं, तिचे पूर्वीच्या वैभवाचे दिवस गेले नाहीत? प्रस्तुतचा काल म्हणजे पडक्या राजमंदिराचे जोत्यावर चालचलाऊ वाडा बांधण्याचा आहे. गवयी लोकांच्या पूर्वीचा राजाश्रय जाऊन त्यांस मध्यम व सुशिक्षित लोकांचा आश्रय पतकरणें भाग पडलें आहे, व अशा स्थितीत आपल्या जुन्या विद्येस किंचित् नवीन स्वरूप देऊन जर लोकप्रिय करण्याचे गवयी लोक नाकारतील तर समाजाची तर हानि आहेच, परंतु त्यांचे व त्यांच्या विद्येचेंही कायमचे नुकसान होणार आहे.
 सयाजीविजय-पुणेकर बातमीदार. ता. ८-३-१९०१


संगीतास सर्व विषय योग्य आहेत काय?

 या नाटकास (शारदा) संगीताचे अवजड स्वरूप दिलें नसतें तर रसभंग वगैरे दोष ग्रंथकाराच्या सहज लक्षात आले असते. हें नाटक लिहिण्याचा हेतु लोकरंजन करण्याचा नसून लोकशिक्षण करण्याचा आहे. या दृष्टीने विचार करितांना ॲडीसन, स्मॉलेट, फील्डिंग यांच्या लेखासारखा आपल्या कृतीचा परिणाम व्हावा असा ग्रंथकारांचा हेतु असल्यास (व तो आहेही) प्रस्तुत विषय संगीतास योग्य आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न उत्पन्न होतो. संगीत व कवित्व ही एकच होत असा चुकीचा समज रा. देवलांच्या विनंतीवरून प्रस्तावना लिहिणाऱ्या गृहस्थांचा झालेला दिसतो. कविप्रतिभेला अमक्या प्रांतांत जाण्यास पूर्ण मुभा व अमक्या प्रदेशांत जाण्यास मज्जाव आहे, असा प्रकार मुळीच नाहीं हें आम्हासही मान्य आहे. परंतु ताल-सुराच्या ठेक्यावर प्रतिभासुंदरीचें आगमन कोणत्या ठिकाणीं मोहक होईल व कोणत्या ठिकाणीं विद्रूप दिसेल हें प्रत्येक