पान:मनू बाबा.djvu/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. परंतु पैशाची ऊब नाहीशी होताच तो कापू लागला. आपले प्राण जाणार असे त्याला वाटले. त्याने आपले ह्रदय घट्ट धरून ठेवले. छाती फुटणार असे त्याला वाटले. तो मध्येच डोळे फाडफाडून पाही. मध्येच तो डोळे मिटी. 'माझं सोनं, माझं सोनं-' असे म्हणून तो रडू लागला.

 पाऊस थांबला होता. परंतु मनू विणकराच्या डोळ्यातून पाऊस पडत होता. आकाश निर्मळ झाले, परंतु मनूचे ह्रदय अंधाराने भरले. तो वेड्यासारखा झाला. 'माझं सोनं, माझं सोनं-' करीत तो झोपडीच्या बाहेर पडला. दिगंबररायांकडे दाद मागवी असे त्यच्या मनात आले, रडत रडत तो निघाला. दिगंबरराय आज घरी नव्हते. त्यांचा मोठा मुलगा संपतराय तोही घरी नव्हता. ते शेजारच्या कोणत्याशा गावी मेजवानीला गेले होते, त्यांच्या घरी गडीमाणसे होती. कारभारी होते. त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. कोणी खेळत होते.

 इतक्यात "माझं सोनं गेलं, माझे प्राण गेले. द्या हो माझं सोनं. आणा हो शोधून. कसं गेलं. माझं सोनं? कोणी नेलं?" असे ओरडत मनू तेथे आला. वाड्यातील सारी मंडळी. त्यांना आधी काही कळेना. सारा गोंधळ.

 "हे पाहा मनू, नीट सारं सांग." प्रमुख म्हणाला.

 "काय नीट सांगू? मी दोरा विकत आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. पावसामुळं दुकानात अडकलो. परंतु पाऊस संपताच घरी गेलो. घरी जाऊन माझी पिशवी पाहतो तो नाही. दोन पिशव्या होत्या दोनशे बह्हात्तर मोहरा होत्या.लवकरच तीनशे झाल्या असत्या. कितीदा तरी या बोटांनी मी त्या मोजीत असे. माझी मोहर मी अंधारातही ओळखीन. गेल्या, साऱ्या गेल्या. तुम्ही जा. शोधा चोर. कुठं गेला चोर? काय करू मी? माझा सारा आनंद गेला. माझी शक्ती गेली. छे! पायानं चालवत नाही. आणा हो माझ्या पिशव्या."

 असे म्हणून तो म्हातारा विणकर तेथे मटकन खाली बसला. त्या सर्वाना त्याची कीव आली. मनूने कधी गोडगोड खाल्ले नही. चांगले वस्त्र ल्यायला नाही. गाडीघोडा ठेवला नाही. चैन त्याला माहीत नव्हती. दिवसभर तो काम करी. काम करून त्यान पैसे जमविले. निढळाच्या श्रमाचे पैसे. परंतु सारे गेले. त्या पैशांचा काय होता त्याला उपयोग?


                                     जमीनदार व त्याचे दोन मुलगे      १९