पान:मनतरंग.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 रात्रीची वेळ. बारा वाजून गेले असावेत. नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी एका हॉटेलपाशी आम्ही गाडी थांबवली. आश्विनातली बोचरी थंडी आता चांगलीच टचटचायला लागली होती. डोक्यावर झापड झुकू लागली होती आणि कोल्हापूर यायला किमान पाच तास लागणार होते. तोपर्यंत चक्रधराला ताजेतवाने ठेवणे भाग होते. अशावेळी सुंठ घातलेला कडक चहा अंगांगात ताजी लहर चेतवतो. कडक चहाची वाट पाहात असतानाच एक बुटकासा, तजेलदार डोळ्यांचा मुलगा पाण्याचे ग्लास हातात घेऊन आला, ग्लास धरताना बोटं पाण्यात बुडालेली. अंगावर बनियनवजा कळकट्ट शर्ट, गळ्यात ताईत,
 "पाणी होना मॅडम ?" त्याने विचारले,
 "अरे, तुझी बोटं त्या पाण्यात बुडवलीस, तेच पाणी पाजणार का आम्हांला ? ग्लास बाहेरून धरावा. आमच्याजवळ पाणी आहे. नको आम्हाला हे पाणी " मी उपदेश करायला गेले.
 "मॅडम, हितलं पानी नकाच पिऊ. कुनीबी चबाढबा गिलास बुडिवतात रांजनात. हजारो येनार जानार. कशी ऱ्हावी स्वच्छता ? मास्तर म्हणतात की, आपल्या देसात शंभरपैकी ऐंशी रोग घाणेरड्या पान्यामुळे होतात," तो समजदारीने बोलत होता.

हे झाड कुणाचे ? मातीचे की आभाळाचे ?/६९