पान:मनतरंग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "...पण ताई हितंच व्हावं लागेला का वो मला ? त्या परिस महिन्याला दोनतीनशे रुपये द्या ना. एक येळंला जेवू. पन बापूंना घेऊन हाईन मी. म्हाताऱ्याला घरात काईच किंमत न्हाई. लई तुटतो जीव, त्यांना पाहून."
 अर्धमुर्धं शिकलेल्या पार्वतीची स्वत:च्या जीवनाबद्दल फारशी तक्रार नव्हती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नवे शिकण्याची जिद्द नव्हती. उभारी नव्हती. ती यावी कुठून ?
 पण बापासाठी तिळतिळ तुटणारं मन होतं.
 पार्वतीबरोबरच्या काही जणी पुढे शिकत असतील, काहीजणींना पार्वतीच्या वाटेने किंवा थोड्याफार वेगळ्या वळणाने पुढे जावे लागले असेल. लाटेत सापडल्यासारखे शाळेत जायचे. ७ वी...१०वी...बारावी नाहीतर बी.ए. च्या काही वर्षापर्यंत घरच्यांच्या मतानुसार शिकायचे आणि नंतर पाहण्याचा कार्यक्रम, हुंडा, मानपान, देणीघेणी या तालावर झिम्मा खेळत...स्वप्नातल्या नव्हे तर अंतरपाटा पल्याडच्या राजासोबत खेळ मांडायचा.

रांधा-वाढा-उष्टी काढा.
पैशांचे नि संसाराचे हिशेब मांडित
गिरवायचा नोकरीचा पाढा.
तर कुठे
लाकूड फाटा..पाणी..आणि रोजगार शोधित
ओढायचा
संसाराचा गाडा
या गाड्यात बुडले तरी, आत जागी असते एक आई, बाळाला जन्म देतानाच्या कळा आठवीत नि बाळाचे पहिले ट्यॅहा ऐकताना सुखावणारी.
एक कन्या, वृद्ध... एकाकी बापाकडे भरल्या डोळ्यांनी पहाणारी, त्यांची व्यथा हृदयात साठवणारी...
एक बहीण, भावाच्या नुसत्या शब्दांनी भरून पावणारी
आणि
एक प्रेयस पत्नी.
सजणाच्या श्वासांच्या गंधासाठी आसुसणारी... जीवनाचे सारे रंग त्याच्यावर समर्पित करणारी.

मनतरंग / ४२