पान:मनतरंग.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 दिवाळीतल्या थंडीचा सुखद गुलाबी काटा आता चांगलाच बोचू लागलाय. डिसेंबरमधल्या थंडीला 'चावरी' म्हणतात ते उगाच नाही ! मार्गशीर्षातली थंडी पडायला लागली की शेतंभातं, परसबागा टवटवीत भाज्यांनी रसरसायला लागतात. तऱ्हेतऱ्हेच्या शेंगा, चवळी... मटकी... मुळ्याच्या डिंगऱ्या, गवार, उसावरच्या शेंगा, भेंडी, मुळा, गाजर, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी. त्यांच्या जोडीला डोळ्यांना मोह घालणारी हिरवीगार मेथी, पालक, चवळाई, आंबटचुका, शेपू, पोफळा, तांदुळजा, माठ घोळ अशा अनेक पालेभाज्या. दुधी भोपळा, चक्रीभोपळा, लाल भोपळा, काकड्या, ढब्बू मिरची, मटार, कर्टूली... शेकडो तऱ्हेच्या भाज्यांनी मंडई फुलून जाते आणि याच काळात शांकभरीचे नवरात्र वाजतगाजत दारात येते.
 या नवरात्राची कथा अशी. हजारो वर्षांपूर्वी प्रचंड दुष्काळ पडला. माणसे अन्नविना मरू लागली. त्यावेळी या देवीने आपल्या देहातून तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती निर्माण केल्या. त्या वनस्पती खाऊन माणसांना जगणे शक्य झाले. 'आत्मदेह समुद्भव' असे आत्मविश्वासाने आश्वासन देत अन्न निर्माण करणारी ही देवी. तिची आठवण 'शाकंभरी' नवरात्राच्या निमित्ताने ठेवली जात असावी.
 निसर्ग आणि आमचे सणवार यांचे नाते अगदी जिवाभावाचे. मार्गशीर्ष

अन्नदा...शांकभरी नि फास्ट फूड !