पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

कीं काय, ह्मणून पुनः प्रश्न केला. त्यास महाराजांनीं 'होय' ह्मणून अस्पष्ट खुणेनें उत्तर दिले.

 "महाराजांनी ह्या प्रसंगीं जें जें भाषण केले, ते मी अक्षरशः कळवीत आहे. ह्याचें कारण, ते त्यांचे अगदीं शेवटचे शब्द होत. मी दुसऱ्या माडीवर जाऊन एक तास झाला नाहीं, तोंच राजवाड्यांतील स्त्रियांचा रुदनस्वर ऐकूं आला; व त्यानें महाराजांचा अंत झाला असे कळविलें!

 "ह्यानंतर पुढें जो शोककारक देखावा दृष्टीस पडला, त्याचें बरोबर वर्णन माझ्यानें देववत नाहीं. स्त्रियांचे आक्रंदन व पुरुषांचे शोकस्वर ह्यांच्या योगानें राजवाड्यांत जिकडे तिकडे जो आक्रोश व जो गोंधळ उडाला, तो वर्णन करणें अशक्य आहे !

 "२० तारखेच्या खलित्यांतील शेवटच्या कलमांत कळविल्याप्रमाणें, मीं महाराजांच्या प्रेताची पुढील तयारी होई तोंपर्यंत, राजवाड्यांत राहण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणे हिंदुराव व तेथें हजर असलेले दरबारचे प्रमुख लोक ह्यांनींही मला विनंति केली. राजवाड्यामध्यें जिकडे तिकडे दुःखाचा देखावा दृष्टीस पडत होता; तथापि त्यांतल्या समाधानाची गोष्ट एवढीच कीं, सती जाण्याची तयारी कोठें आढळून आली नाहीं. ज्या वेळीं एखादी स्त्री आपल्या प्राणपतीबरोबर सती जाण्याचा विचार करित्ये, त्या वेळीं तिच्या दुःखास एक प्रकारचे गंभीर आणि उदात्त स्वरूप येत असतें. मग ती त्या वेळीं नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत नाहीं, किंवा मोठ्यामोठ्याने धाय मोकलून रडत नाहीं. मग ती आपला तोंडावरचा पदर एकीकडे सारून सर्व लोकांपुढें येते व आपला निश्चय व्यक्त करिते. अशा प्रकारचे चिन्ह मला बिलकूल दिसत नव्हतें. ह्मणून, जेव्हां बायजाबाई महाराजांबरोबर सहगमन करणार अशी बातमी माझ्या कानावर आली, तेव्हां त्यांचा प्रतिबंध करण्यास फार कठीण जाणार नाहीं अशी मला खात्री वाटत होती. ह्या कारणा-