पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२



आयुर्वृद्धीकरितां त्यांनी दैवी व मानवी उपाय सुरू केले; व तत्प्रीत्यर्थ पुष्कळ द्रव्य खर्च करण्याचा संकल्प केला. ह्या समयाची हकीकत ता. ८ जून इ. स. १८६३ च्या 'ज्ञानप्रकाश' वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. ती वाचली ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या अंतकालीं महाराज जयाजीराव ह्यांनी त्यांच्याविषयीं आपली भक्ति कशी व्यक्त केली, हें दिसून येतें. ती हकीकत येणेंप्रमाणें :-

 "श्रीमंत बायजाबाईसाहेब शिंदे यांस कितीएक दिवस दुखणें लागून त्यांची प्रकृति हल्ली फारच बिघडली आहे. वैद्य व हकीम, अनुष्ठानें करणारे भट, ग्रहांची पीडा घालविणारे जोशी, देवऋषी, पंचाक्षरी वगैरे लोकांचा रोजगार पिकून हजारों रुपयांची त्यांस प्राप्ति होत आहे. श्रीमंत शिंदे सरकार व त्यांचे कारभारीमंडळ बाईसाहेबांच्या शुश्रूषेंत व काळजींत निमग्न झाल्यामुळे आठ दहा दिवस दरबार नाहींसें झालें आहे. बाईसाहेबांची प्रकृति अत्यावस्थ झालेली पाहून अलिजाबहादुर जयाजीराव यांणीं सर्वांसमक्ष त्यांस विनंति केली की, "आपण मनास वाटेल तितका दानधर्म करावा. या कामांत जो पैसा लागेल तो खजिन्यांतून मागून घ्यावा." व त्याच वेळेस महाराजांनीं एक लाख रुपये आणून दाखल केले; आणि असेंही सांगितलें की, “उज्जन परगणा आपला आहे. हा आपण कोणास बक्षीस देण्यास इच्छित असल्यास तसें करावें. त्यांत माझा नकार नाहीं. मी सर्वस्वीं आपला अंकित आहे.” हे भाषण ऐकून बाईसाहेबांस मोठा गहिंवर आला; आणि मोठ्या ममतेने त्यांनी महाराजांचे मुखावरून हात फिरवून सांगितले कीं, तुह्मांस जसें नीट दिसेल तसें करावें. श्रीमंत चिमणाराजा-शिंदे सरकारचें कुटुंब-यांचे नांवाने सर्व मालमत्ता व उज्जनी परगणा देण्याचा आपला मानस बाईसाहेबांनी प्रकट करून, त्या गोष्टीस कांहीं अंशीं इंग्रज सरकारची मंजुरी जरूर असल्याकारणानें, मेजर मीडसाहेब मध्य