पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रोजगार हमी योजना सर्व जगभर गाजली. ही योजना आपणच अमलात आणली असं श्रेय घेणारे, महाराष्ट्रातले निदान दोनचार नेते मी पाहिले आहेत; पण रोजगार हमी योजनेचे खरे श्रेय वसंतरावांना आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजना हे त्यांचे आणखी एक श्रेय. भाताला आधारभूत किमतीपेक्षा अधिक किंमत द्यायची नाही असे धोरण केंद्र सरकारने आखले. त्यावेळी वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री या भूमिकेतून केंद्र सरकारला ठणकावून सांगितले की, "लेव्हीचे भात तुम्हाला आधारभूत किमतीने दिल्यानंतर उरलेल्या भाताला मला जी योग्य वाटेल ती किंमत मी देईन." वसंतराव हे ज्वारीची खरेदीची व्यवस्था करणारे मुख्यमंत्री होते. म्हणजे त्यांची प्रेरणा काय होती?
 भारतात शेती ही जीवनशैली म्हणून मानली जात असे. त्यात कुणी टाटा-बिर्ला होऊ शकत नव्हता. शेतकऱ्यांनी सकाळी उठून कामाला लागावं, पाऊस पाडणाऱ्या वरच्या परमेश्वराचं कौतुक करावं, त्याचे आभार मानावे, त्याच्या मर्जीला जे काही येईल आणि आपल्या पदरामध्ये तो जे काही घालेल त्यावर जगावं आणि समाधान मानावं अशी ही जीवनशैली होती. अगदी शाळा-कॉलेजातील पुस्तकांतसुद्धा लिहिलेलं असायचं की शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघू नका, ती एक जीवनशैली आहे! म्हणजे शेतावर नांगर चालवता चालवता तुमच्या अंगावरचं धोतर फाटकंच राहिलं, मळकंच राहिलं तरी तक्रार करू नका. गावातला पोरगा शहरात गेला आणि कोणत्यातरी बँकेत नुसता चपराशी झाला की तीन महिन्यांच्या आत टेरिलीनची पँट घालून, खांद्याला ट्रान्झिस्टर लटकावून गाणी गुणगुणत खेड्यात येतो त्याच्याबद्दलही तक्रार करू नका. कारण, त्याची जीवनशैली वेगळी आणि शेतकऱ्याची जीवनशैली वेगळी!
 या जीवनशैलीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम करणारी जी मंडळी होऊन गेली त्यांमध्ये जोतिबा फुले, शाहू महाराज यांची नावे घेतली जातात. या परंपरेतले वसंतराव नाईक हे शेवटचे शेतकरी नेते होते असे म्हणावे लागेल. त्यांनी काय केलं?

 शेती ही आता जीवनशैली नाही, शेती हे एक शास्त्र आहे, कौशल्य आहे. जशी जमेल तशी शेती करायची नाही; आवश्यक तर पाण्याची व्यवस्था करायची आहे, चांगलं बियाणं वापरायचं आहे. खतं औषधं वापरायची आहेत आणि शास्त्रीयदृष्ट्या शेती करून उत्पादन वाढवायचं आहे. शेतीकडे पाहण्याचा हा एक दुसरा टप्पा झाला. याला आपण हरितक्रांतीचा टप्पा म्हणू. स्व. वसंतराव नाईक हे शासनातर्फे हरितक्रांतीच्या टप्प्याचे अग्रणी होते.

बळिचे राज्य येणार आहे / १६९