पान:पाकिस्तानचे संकट.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १०वें आंबेडकर व पाकिस्तान राष्ट्ररक्षण व शांततारक्षण काय .. मुसलमानांची पाकिस्तानची मागणी मर्यादित स्वरूपांत मान्य केल्यास त्या मान्यतेचा हिंदुस्थानच्या-म्हणजे पाकिस्तान वगळून उरलेल्या हिंदुस्थानच्या सैनिक सामर्थ्यावर व राष्ट्ररक्षणक्षमतेवर कोणता परिणाम होईल असा प्रश्न उपस्थित करून, डॉ. आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथाचे एक स्वतंत्र प्रकरण या प्रश्नाच्या ऊहापोहांत खर्च केले आहे. सध्यांच्या काळी हिंदूंमधील लष्करी दृष्टि अतिशय लोप पावलेली असल्यामुळे आणि लष्करी अनुभवच नव्हे तर साधी लष्कर-विषयक माहिती मिळण्याचीहि शक्यता कमी झालेली असल्यामुळे, आपल्या ग्रंथांत डॉ० आंबेडकरांनी या विषयाला एक स्वतंत्र प्रकरण दिलें याबद्दल प्रत्येक हिंदु वाचकाला समाधानच वाटेल. लष्करखातें हे मध्यवर्ति सरकारच्या ताब्यांतलें खातें आहे आणि लष्करावर होणारा खर्च मध्यवर्ति सरकारच्या तिजोरीतून होत असतो. मध्यवति सरकारची तिजोरी ज्या करांमुळे तुडुंब भरते त्या करांचा फार मोठा हिस्सा हिंदुप्रधान प्रांतांकडून व हिंदूंकडून दिला जातो. असे असूनहि, हिंदुस्थानचे म्हणून जें सैन्य पोसले जातें त्यांत पंजाबमधील मुसलमान व सरहद्दीवरचे पठाण यांचा वारेमाप भरणा केला जातो, ही गोष्ट डॉ० आंबेडकर यांनी या प्रकरणांत ठसठशीतपणे दाखविली आहे. मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास' ही या पुस्तकाची तीन प्रकरणे ज्यांनी काळजीपूर्वक वाचली असतील त्यांच्याहि लक्षांत सदर मुद्दा आलाच असेल. १८५७ सालच्या बंडापासून सैन्यांत मुसलमानांचा भरणा कां वाढत गेला, मुसलमानांची राजनिष्ठा या भरण्याला कशी प्रोत्साहक झाली वगैरे गोष्टी या तिन्ही प्रकरणांतून सूचित व दर्शित झालेल्या आहेत.