पान:परिचय (Parichay).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४ । परिचय
 


असे या प्रसंगाचे वर्णन करता येईल असे मानते. माझी स्वतःची भूमिका याबाबतीत इतिहासकारांच्या दृष्टीने पुराव्याच्या विरोधी व देशभक्तांच्या दृष्टीने पूर्वग्रहदूषित अशी काहीशी आहे. सत्तावनच्या एकूण उठावणीला शिपायांच्या अनेकविध तक्रारी कारण झाल्या; या उठावणीला एकही चांगला नेता मिळाला नाही; अदूरदर्शी स्वार्थ या उठावणीत सर्वत्र होता; ह्या सर्व बाबी जरी मान्य केल्या तरी सत्तावन्न साली इंग्रजांच्याविरुद्ध या देशात प्रक्षोभाची एक प्रचंड लाट उचंबळून वर आली होती हे नाकारता येणार नाही. मागासलेल्या देशात परकीय राज सत्तेच्याविरुद्ध होणारा पहिला लढा या स्वरूपाचा असणे भाग असते, असे मला वाटते. भारतापुरते बोलावयाचे तर हा देश इंग्रजांना जिंकता आला याची कारणे म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडींसंबंधी आमचे प्रचंड अज्ञान, राष्ट्रीय भावनेचा अभाव, आपापसांतील दुफळी, मागासलेली शस्त्रसंघटना, जुनाट युद्धतंत्र वगैरे वगैरे बाबींचा उल्लेख करावा लागेल. अशा या देशाने एखादे राजकीय तत्त्वज्ञान सुसूत्रपणे आत्मसात करावे, त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे अखिल भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नियोजन करावे व लढ्याला निश्चित धोरण, निश्चित कार्यक्रम, निश्चित राजकीय सामाजिक दृष्टिकोण द्यावा ही अपेक्षा चूक आहे. मागासलेले देश जेव्हा पारतंत्र्यात जातात, तेव्हा पहिले उठाव असेच अनियोजित, प्रक्षोभाच्या स्वरूपाचे असणार. म्हणून १८५७ ची तुलना इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया, आयर्लंड यांच्या स्वातंत्र्यलढयाशी करण्यापेक्षा आफ्रिकेतील उठावण्या, चीन मधील सन्यत्सेनपूर्वकालातील शेतकरी उठावण्या, यांच्याशी करणे इतिहासत: न्याय्य होईल. सत्तावन्न सालच्या उठावाने, पुढे देशभर ज्या चळवळी सुरू झाल्या, त्यांना प्रेरणा दिली नाही. ही गोष्ट खरी आहे. ज्यांच्या सामाजिक चळवळींतून पुढे चालून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत मोठी संस्था निर्माण झाली त्या काँग्रेसच्या जन्मदात्यांच्या मनात सत्तावन्न सालाविषयी फारशी आत्मीयता नव्हती ही गोष्ट खरी आहे. प्रत्यक्ष लोकमान्यांनासुद्धा सत्तावन्न सालाविषयी फारसे प्रेम नव्हते हीही गोष्ट खरी आहे. पण हे सत्य अपूर्ण आहे. या सत्याला अजून एक बाजू आहे. ती म्हणजे, सावरकरांनी ज्या वेळी भारतव्यापी सशस्त्र उठावाची योजना केली त्या वेळी प्रेरक शक्ती म्हणून सत्तावन्न साल त्यांच्यासमोर उभे होते. भारतीय स्वातंत्र्यलढा ज्या टप्प्यांनी चालला त्यांत दीर्घकाळ कुणी उठावणीच केली नाही, पण ज्यांनी ज्यांनी इंग्रज राज्यसत्तेच्या विरुद्ध सशस्त्र उठावणीचा विचार मनात आणला त्यांना सत्तावन्न सालाने काही प्रेरणा निश्चित दिल्या आहेत.
 माननीय हरिहरराव देशपांडे या बाबतीत सरकारी धोरणाला अनुकूल म्हणजेच सावरकरांचे विवेचन मानणारे आहेत. या भूतलावर असणाऱ्या संस्कृतींच्यापैकी भारतीय संस्कृती ही काहीतरी विशेष आहे. पराक्रम, त्याग इ. सद्गुणांत