पान:परिचय (Parichay).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. १८५७ च्या वीर महिला


भारताच्या आधुनिक इतिहासात १८५७ साली घडलेल्या घटनेचे एक विशिष्ट स्थान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इ. स. १९०८ साली या विषयावर एक लोकविलक्षण पुस्तक लिहिले. तेव्हापासून आजतागायत भारतीय विवेचकांनी आपली लेखणी या विषयावर सतत चालविली आहे. विशेषतः १९५७ साली स्वतंत्र भारतात आपल्या सरकारने १८५७ हे पहिले स्वातंत्र्यसमर होते ही गोष्ट अधिकृतरीत्या उद्घोषित करून स्वातंत्र्यसमर शताब्दी साजरी केली. या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तावन्न सालाविषयी नव्याने पुष्कळसे ग्रंथ बाहेर पडले. माननीय ह. वा. देशपांडे यांचा ग्रंथ जरी दोन वर्षे नंतर प्रकाशित झालेला असला तरी त्या निमित्तानेच लिहिण्यासाठी हाती घेतलेला होता. १८५७ विषयी परस्परविरोधी

अशा दोन भूमिका घेतल्या जातात. पहिली भूमिका, उठावाच्या आधी काही वर्षे त्या उठावाची पूर्वतयारी चालू होती; तो एक नियोजनपूर्ण उठाव होता; या उठावात भाग घेणारे लोक देशाच्या स्वातंत्र्यांसाठी हौतात्म्य पत्करण्यास सिद्ध झालेले वीर पुरुष होते असे मानते. आणि पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करताना होता होईतो दुर्दैव हे एकमेव कारण पराभवाचे कसे ठरेल या दृष्टीने विवेचन करते. याच्या अगदी विरोधी असणारी दुसरी भूमिका, शिपायांचा हा उठाव, शिपायांच्या तक्रारी,धार्मिक गैरसमज, चिडलेले पराभूत संस्थानिक यांचा गोंधळपूर्ण उठाव होता; त्याला फारसे नियोजन नव्हते; स्वार्थ आणि लुटीचा मोह त्यात अधिक होता, जनतेचा फारसा पाठिंबा या घटनेला नव्हता म्हणून फार तर शिपाईगर्दी