पान:निर्माणपर्व.pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण सभा ठीक ५।। ला सुरू झाली. प्रारंभी कुमार सप्तर्षी यांनी 'यूथ ऑर्गनायझेशन'ची माहिती सांगितली. भाषणाचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग असल्याने त्यांनी चार-पाच मिनिटांतच आवरते घेतले. नंतर श्री. ग. माजगावकर यांनी थोडक्यात ‘बिहार परिवारा'मागील भूमिका विशद केली. पंतप्रधानांचा, महापौरांचा निधी असला तरी कुणी कार्यकर्ते यासाठी घरोघर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रातील आवाहने हवेत राहतात, इच्छा असूनही जनता प्रवृत्त होऊ शकत नाही, म्हणून असे छोटे छोटे स्वतंत्र प्रकल्प. शिवाय मोठमोठ्या निधीचे काय होते, शेवटपर्यंत आपण दिलेली मदत पोचते की नाही, याची जनतेला नेहमी शंका वाटत राहते. यापेक्षा लहानसा निधी, आपल्या ओळखीच्या, विश्वासाच्या माणसाजवळ दिला तर लोकांना अधिक खात्री वाटण्याचा संभव' ... इत्यादी मुद्दे.

 कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा ठराव संमत झाला.

 कुणी कुलकर्णी नामक एक मुलगा भाषण करायचे आहे म्हणून पुढे आला व त्याने, त्याला स्कॉलरशिप म्हणून मिळालेले ५१ रुपये तिथल्या तिथेच ‘बिहार परिवारा'च्या स्वाधीन केले.

 श्री. रावसाहेब पटवर्धन यांनी उचित समारोप केला.

 सभेला उपस्थिती चांगली होती. संख्येने नाही, गुणवत्तेने. सर्वश्री मोहन धारिया, रामभाऊ म्हाळगी, ग. प्र. प्रधान, नामदेवराव मते, 'तरुण भारत'चे संपादक चं. प. भिशीकर, वा. ब. गोगटे, अच्युतराव आपटे, डॉ. अरविंद लेले, वि. ग. कानिटकर, भाऊसाहेब नातू आणि आपल्या मुलाचे, मुलीचे, भावाचे कौतुक पाहायला जमलेली पालक मंडळी.

 रात्री दहाच्या सुमारास, धान्याच्या पोत्याने भरलेले दोन ट्रक्स 'माणूस' कार्यालयासमोर घोषणा देत येऊन थडकले. कोल्हापूरची तुकडी आली होती. ट्रक्समधल्याच सतरंज्या काढून कार्यालयाबाहेरच्या अडचणीच्या जागेत दाटीवाटीन बैठक भरली. ओळखीपाळखी झाल्या. संध्याकाळच्या सभेतील ठराव वाचून दाखवण्यात आला. ‘बिहार परिवार'चे बॅजेस या तुकडीला देण्यात आले. रसपान आटोपले आणि तुकडीने नगरच्या दिशेने आगेकूच केले.


 रविवार, दिनांक १४ मे. सुमारे ४० विद्यार्थ्यांनी ‘पूनम' व 'कॉफी हाऊस' या उपाहारगृहांत दिवसभर वेटर म्हणून कामे करून ' बिहार टिप्स ' गोळा केल्या. काहींनी बाहेर गाड्या पुसल्या, बुटपॉलिशही केले.

 शनिवार दि. २० व रविवार दिनांक २१ हे दोन दिवस लोणावळयासाठी विद्यार्थ्यांना राखून ठेवले होते. या दोन दिवसाची कथा अशी. कथा लेखकाचे नाव सुहास मेहेंदळे-

निर्माणपर्व । ७४