पान:निर्माणपर्व.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सुहास लिहितो : आणि मग ‘यूथ ऑर्गनायझेशन'च्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला. सर्वांनी लोणावळ्याला जायचं; तिथल्या हवा खायला आलेल्या लोकांकडून पैसे गोळा करायचे-बिहारच्या भुकेल्यांना अन्न पुरवण्यासाठी ! मग योजना साकार होऊ लागली. चक्रे फिरू लागली. लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सह्या असलेली पत्रकं छापून घेतली गेली. मराठीत, इंग्रजीत. दोन दिवस जायचं ठरलं. राहण्याची सोय डॉ. आगाशेबाईंकडे झाली. एक वेळचं जेवण एका कारखान्याच्या अधिकाऱ्याकडे, आणखी एक वेळचं जेवण त्याच कारखान्यातील कामगारांकडे. एक वेळचा डबा न्यावयाचा. प्रवासाचं भाडं प्रत्येकाचं. आता अडचण अशी उरलीच नाही. लक्ष केंद्रित झालं होतं ते शनिवारवर !

 अन् शनिवार सकाळ उजाडली. 'यूथ ऑर्गनायझेशन'चे आम्ही चाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे स्टेशनवर जमलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. पूनम-पूना कॉफी हाऊस मधील अनुभव होता. इतक्यात एकाच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली. आमच्यातील चौघे डेक्कन क्वीनमध्ये चढले आणि लोणावळा येईपर्यंत लोकांकडून पैसे गोळा करू लागले. एका तासात दोनशे रुपये जमले. उत्साह वाढला. लगेचच्या लोकलने इतर मुले आली. त्यांना बातमी समजली. उत्साह द्विगुणित झाला. लगेच वेगवेगळ्या बॅचेस पाडल्या गेल्या. प्रत्येक जोडीला एकेक भाग वाटून दिला गेला. कामाला सुरुवात झाली देखील...

 लोणावळ्यात एक वेगळंच वातावरण पसरलं. बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर्स लावली गेली. मुलं-मुली गटागटांनी हिंडत होती. लोकांना बिहारमधील परिस्थितीची माहिती देत होती. जाणारे-येणारे लोक थबकत होते.... हे दृश्य पाहत होते. कुतूहल वाटत होतं. उत्साह वाटत होता. कौतुक स्पष्ट दिसत होतं.

 मदत केली जात होती. लोणावळ्यातील रहिवाश्यांनीदेखील आपली मुलं-मुली आमच्याबरोबर पाठविली. त्यांच्या ओळखीच्या घरी आम्ही जात होतो. हक्काने पैसे घेत होतो. दहा वाजता सुरू झालेलं हे काम दीड वाजला तरी चालूच होतं. उन्हाची तमा वाटत नव्हती. श्रम वाटत नव्हते. एरवी चार पावलं चालल्या की दमणाऱ्या ह्या पोशाखी मुली प्रत्येक घरात जात काय होत्या...बिहारसाठी मदत काय मागत होत्या...पैसे मिळाले की आनंदित काय होत होत्या...सगळं वातावरण उत्साहमय होतं...जाणीव होती ती बिहारमधील गंभीर परिस्थितीची !!

 आणि लोक तरी काय तऱ्हेतऱ्हेचे भेटले ! बहुतेक सगळ्यांना दुष्काळाची जाणीव दिसली. नव्हती ती फारच थोड्यांना. पण बिहार परिवाराचे बिल्ले लावलेली मुलं-मुली दिसली की, काही दारं धाडकन लावली जात...काहीजण लहान मुलांना पाठवीत ..मग ती सांगत- “आमचे पप्पा किनई बाहेल गेलेत अन् पलत येनाल नाहीत." पुन्हा दारं लावली जात...!

बिहार परिवार । ७५