पान:निर्माणपर्व.pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बिहार परिवार



 एप्रिलचा शेवटचा आठवडा. कुमार सप्तर्षीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस. प्रॅक्टिकल आटोपून रात्री ८-८। च्या बेताला ते कॉलेजमधून तडक श्री. ग. माजगावकर यांच्या घरी येतात. अनिल अवचट ठरल्याप्रमाणे आले की नाही याची चौकशी करण्यासाठी अरुण साधू यांच्या दोन-चार चकरा झालेल्या असतात. शेवटी जेवायला चौघेजण बसले तेव्हा घड्याळाचा काटा ९।। च्या पुढे सरकलेला असतो.

 रात्र चढत चालली तसे बोलणे मुख्य विषयाकडे वळलेले आहे-बिहार आणि पुण्यातील विद्यार्थीवर्ग-त्यातल्या त्यात ' यूथ ऑर्गनायझेशन.' (युक्रांदचे अगोदरचे नाव).

 पाचशे दुष्काळग्रस्तांसाठी एक अन्नछत्र कमीत कमी एक महिन्यासाठी, जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी चालविण्याची संपूर्ण जबाबदारी उचलावी. निधी गोळा करण्यापासून, बिहारात जाऊन प्रत्यक्ष अन्नछत्र चालविण्यापर्यंत. या कल्पनेवर बराच खल होतो. बिहारसाठी काहीतरी, कुठेतरी वेगवेगळे करण्यापेक्षा अशी लहानशी जबाबदारी पूर्णपणे उचलण्यात विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यय येईल, उभारणीचे समाधान लाभेल व तऱ्हेतऱ्हेचे अनुभव येतील, ही, हा कार्यक्रम सुचवण्यामागील श्री. ग. माजगावकर यांची दृष्टी होती.

 आठवडाभर यावर अधिक विचार झाला. 'माणूस' कार्यालयात दुसरी बैठक भरली. वरील चौघांव्यतिरिक्त या बैठकीला ' यूथ ऑर्गनायझेशन'चे आणखी ८।१० कार्यकर्ते होते-शिवाय मावळ सेवा मंडळाचे श्री. चिंचलीकरही ऐनवेळी उपस्थित झाले. ' माणूस प्रतिष्ठान' आणि ' यूथ ऑर्गनायझेशन' यांनी संयुक्तपणे ' बिहार दुष्काळ निवारण प्रकल्प' सुरू करावा यावर एकमत झाले.

 'दुष्काळ निवारण' हा शब्द सर्वानाच खटकत होता. कारण वापरून वापरून तो फार गुळगुळीत झालेला आहे. म्हणून ' बिहार परिवार' हे नामकरण. शिवाय निधी जमवण्याच्या कार्याला ‘ परिवार' या शब्दामुळे येणारा कौटुंबिक आपलेपणाचा वेगळाच स्पर्श.

निर्माणपर्व । ७२