पान:निर्माणपर्व.pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तसा हा प्रयोग महाराष्ट्राला अगदी अपरिचित आहे असेही नाही. सामुदायिक नाही, पण संयुक्त सहकारी शेतीचा एक अभिनव प्रयोग मिरजजवळील म्हैसाळ या गावी शंभरएक हरिजन कुटुंबांनी यशस्वी करून दाखविलेला आहे. पण सरकारचे, तज्ज्ञांचे, विरोधी पक्षांचे-कोणाचेच या प्रयोगाकडे अद्याप लक्ष गेलेले नाही. सातपुड्यात शहादे भागात जंगल जमिनीवर हा प्रयोग आम्ही सुरू करतो अशी तेथील आदिवासींची आज वर्षभर मागणी आहे. त्यासाठी सत्याग्रह, शिष्टमंडळे वगैरे सर्व मार्ग हाताळूनही झालेले आहेत. अशी अनुकूल लोकमानस असलेली दहा-वीस ठिकाणे महाराष्ट्रात निवडून काढणे अशक्य आहे काय ? मालकीचे आकर्षण कायम राहील, सामुदायिक प्रकल्पाचे सर्व फायदेही पदरात पाडून घेता येतील असा एखादा नवीन पर्यायही हुडकणे अवघड नाही. शिवाय ध्येयवादी तरुणांची शक्तीही या प्रयोगाकडे वळवता येईल. आज सक्तीने म्हणा, आवडीने म्हणा, शेकडो तरुण खेड्यांकडे जात आहेत. योजना व निश्चित कार्यक्रम या अभावी या तरुणशक्तीची आज अनेक ठिकाणी विनाकारण उधळपट्टी होत आहे. लोकसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शासनाचे प्रतिनिधी, राजकीय नेते या सर्वांनी एकत्र येऊन, या शक्तीचा उपयोग विधायक नवनिर्मितीसाठी करून घेतला पाहिजे. यासाठी सामुदायिक शेतीसंस्था हे नवे उभारणी केंद्र ठरू शकते. पूर्वी देवस्थानाभोवती समाज संघटित होत असे. आता अशी नवीन जनस्थाने उभारली पाहिजेत. लोकसेवक, युवक यांचा या उभारणीत हातभार लागला की, ही जनस्थाने केवळ सरकारी सत्तास्थाने न राहता लोकांची नवी श्रद्धास्थानेही ठरतील. स्वयंभू देवस्थानांची जागा अशी नवी स्वयंभू जनस्थाने घेतील. यासाठी निःस्पृह व निःस्वार्थ कार्यकर्त्यांनी, जेथे भूमी अगोदरच अभिमंत्रित करून ठेवलेली आहे, अगोदरच जेथील लोकमानस संस्कारित झालेले आहे अशा जागा प्रयत्नपूर्वक हुडकून, तेथे हा नव-निर्माणाचा प्रयोग हाती घेणे अधिक उचित ठरेल. ठाणे जिल्ह्यात सर्वोदयी कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पुणे जिल्ह्यातील मावळात संघस्वयंसेवक आहेत. नगर जिल्ह्यात डावे पक्ष आहेत. जिथे जिथे लोकशिक्षणाचा पहिला पाठ व्यवस्थित दिला गेलेला आहे, किंवा दिला जाईल अशी खात्री वाटेल, तिथे तिथे हा प्रयोग ताबडतोब हाती घेण्यासारखा आहे. हा जर लोकसेवक या प्रयोगात नसला तर मात्र हा केवळ एक नोकरशाहीवाढीचा प्रकल्प ठरेल–ज्याचे भवितव्य सांगण्याची फारशी आवश्यकता नाही. नोकरशाहीने क्रांतीची वाफ साठवून ठेवण्याचे कार्य करायचे असते. वाफेची निर्मिती हा एखादा लोकसेवक किंवा अशा सेवकांच्या लोकसंघटनाच करीत असतात. म्हणून नोकरशाही, सरकार जागे होईल तेव्हा होईल. लोकसेवकांनी तरी पेरियर नदीच्या काठच्या प्रयोगाची शक्यतो लवकर दखल घ्यावी असे आग्रहाने सुचवावेसे वाटते.

१४ एप्रिल १९७३
पेरियर नदीचा काठ । ७१।