पान:निर्माणपर्व.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



या पत्राची ही माहिती खरी नसण्याचीही शक्यता आहे. कारण डॉ. विश्राम हरी व त्यांचे शेतीवाडीवर असलेले चिरंजीव जगन्नाथ विश्राम या दोघांनी आम्हाला ५०० एकर जमीनच त्यांच्याकडे असल्याचा निर्वाळा दिला. शिवाय आपण सावकारी पै पाव आण्याचीही करीत नसल्याचे सांगितले. खरेखोटे परमेश्वर जाणे. पण पाचशे एकर हीसुद्धा काही लहान जमीन नाही. आदिवासींना असे खासच वाटत असले पाहिजे, की या जमिनीवर आपला हक्क आहे. आपल्याला या जमिनीचा वाटा मिळाला पाहिजे. ही त्यांची अपेक्षा-मागणी अन्याय्य आहे असे चालू काळात तरी कुणीच म्हणू शकणार नाही.

 आदिवासीला आपल्या नावावर चालू असणारी फसवणूक आणि लुटालूट समजू लागली आहे. समजल्यावर तो संतापणे, सूडाची भावना त्याच्या ठिकाणी जागी होणे साहजिक आहे. शहादे भागात एक साखर कारखाना सुरू होत आहे. भागधारकांची संख्या असेल दोन-अडीच हजार तरी. आदिवासी भागातील उद्योग म्हणून सरकारी कृपादृष्टीला विशेष पात्र ठरलेला हा कारखाना. आदिवासींचे प्रमाण भागधारकांत किती असावे ? एक टक्कादेखील नाही. आदिवासी कल्याणाच्या नावावर गुजर-पाटील-कोळी या सधन जमीनमालक वर्गाने सर्व राखीव सरकारी सवलती तर लाटल्याच आणि प्रत्यक्ष आदिवासींच्या हातावर तुरीदेखील ठेवल्या नाहीत.

 ‘या साखर कारखान्याच्या गाड्यातून दोन तारखेला (मे) म्हसावदला माणसे आणली गेली, आमच्यावर हल्ला करण्यासाठी. यासाठी हा कारखाना इथे आहे काय ?' एक आदिवासी कार्यकर्ता संतापून बोलत होता, आम्ही शहाद्याला पोचलो त्यादिवशी संध्याकाळीच झालेल्या एका बैठकीत. आदिवासींच्या विकासासाठी निघालेला कारखाना आदिवासींवर अन्याय व जुलूम करणाऱ्या शक्तींचा बालेकिल्ला ठरणार असेल तर आदिवासी एक दिवस तो ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे पुढचे चित्र सूचित करणारे हे उद्गार नाहीत, असे कोण म्हणेल ?

 अल्पसंख्य धनिक समाजाचे, बहुसंख्य श्रमिक जनतेवरील या प्रकारचे वर्चस्व, ही मक्तेदारी यापुढे चालणार नाही, हा 'न्याय' या शब्दाचा व्यापक सामाजिक अर्थ आहे. सामाजिक व आर्थिक न्यायही आदिवासीला मिळाला पाहिजे. भीक म्हणून वाढलेल्या विकासाच्या चार तुकड्यांवर समाधान मानण्याइतका तो राजकीय दृष्ट्या अप्रबुद्ध राहिलेला नाही. त्याची अस्मिता आता जागृत झालेली आहे. चालू स्थितीत हा सामाजिक न्याय मिळविण्याचा मार्ग त्याला सापडत नाही, म्हणून स्वतंत्र आदिवासी राज्याची स्वप्ने तो कधी रंगवतो, तर कधी नक्षलवादाची लकेर मारण्याची ऊर्मी त्याला येते. या स्वप्नांपासून आणि ऊर्मीपासून याला परावृत्त करायचे असेल तर त्याच्या लोकसंख्येच्या

निर्माणपर्व । ३६