Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३
रानड्यांच्या 'क्षमा-शांति'मत्त्वाचें उज्ज्वल चित्र.

आपणां सर्वांची स्थिति आहे. लोकोत्तर दानत फारच थोड्यांत सांपडावयाची, मानापमानाचे गाठोडें बाजूस ठेवणारा एकादाच. 'आपणास चिमोटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत जावें' हा समर्थांचा अमोल उपदेश वाचणारे असतील, परंतु आचरणांत आणणारे किती हरीचे लाल सांपडतील? अशा गुरूच्या सहवासानें गोखल्यांस किती तरी धडे शिकतां आले असतील. त्यांचा स्वभाव रागीट असे. सांगितलेले काम वेळच्यावेळी झालें नाहीं म्हणजे ते संतापावयाचे. परंतु पुढे पुढे जरी ते संतापले तरी नोकरास बोलावून त्यास पुनः सांगत 'मी बोललों; वाईट केलें. परंतु तूं मनांत वाईट वाटू देऊं नकोस.' त्यांच्या डोळ्यापुढे अशावेळीं रानड्यांचे उदाहरण असे. आपल्या पतित व अस्पृश्य मानलेल्या लोकांचा उद्धार करण्याची स्फूर्ति अशाच उदाहरणांवरून त्यांस होई. आणि मी अस्पृश्यांसाठी अखंड प्रयत्न करीन अशी अट भारतसेवक समाजांतील सभासदांस मान्य करावी लागे. सर्व लोकांसाठीं गोखल्यांचें अंतःकरण हळहळे यास कारण रानडेच होत. रानड्यांस ह्यूम साहेबांसारखे काँग्रेसचे जनक 'महादेव' (मोठा देव) मानीत यास केवळ त्यांची विद्वत्ता व कुशाग्रबुद्धीच कारण नसून त्यांचे 'दया, क्षमा, शांति' हे लोकोत्तर गुणच विशेष कारणीभूत झाले असतील. रानड्यांचीही थोरवी पाहिली म्हणजे त्यांच्या चरणांपाशीं बसून ज्यानें धडे घेतले त्याच्या भाग्याची कल्पना येते व आपणांस तर हेवा वाटतो. 'It is no exaggeration to say that younger men, who come in personal contact with him felt as in a holy presence, not only uttering 'nothing base' but afraid even of thinking unworthy thoughts, while in his company. The only other man, who had exercised a similar influence upon me in my experience is Mr. Dadabhai.' असे उद्गार गोखल्यांनी रानड्यांबद्दल, दादाभाईबद्दल आणि पुढे महात्मा गांधींची भेट झाल्यावर काढले ते उगाच नव्हत. खरोखरच त्या पवित्र वातावरणांत गेलें कीं, आपल्या कुत्सित कृपण विचारांचा मागमूस सुद्धां रहात नाहीं. आपण मुके बनतो आणि त्या थोर पुरुषांच्या चरणांकडे पहात राहतों.