पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यातील वल्लरी, सचिन, भारत, संगीताच्या कथा हाच प्रश्न विचारतात ना? उत्कर्षाच्या सूर्योदयाची वाट वंचितांनी आयुष्याचा सूर्यास्त होईपर्यंत का पाहायची? का रोज सोसायचं? हे प्रश्न मित्रांनो, तुम्हास जोवर अस्वस्थ करणार नाहीत तोवर या कथा समाजमनाचा पिच्छा पुरवत राहतील. समाजाच्या पाठकुळीवरचा छळ, विद्वेष, उपेक्षेचा पाठलाग जोवर संपणार नाही तोवर अन्यायाचा वेताळ उतरणार नाही, याची खूणगाठ बांधणा-या या कथा म्हणजे नवसमाज रचना व नवं समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नातील एक खारीचा प्रयत्न होय. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

 १ मे, २०१३

 महाराष्ट्र दिन

डॉ. सुनीलकुमार लवटे