पान:तिच्या डायरीची पाने.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना. घेऊन या म्हणून धाडलंय. करा तयारी. सांजच्या आत गडाला पोचाया हवं. वाट पहातीला.' सासरा विनवू लागला. 'तवाचं आमाला पटलं न्हवतं, पण मोठ्यांसमुर कसं बोलावं? म्हणून गप हायलो. चुलत काय नि सख्खा काय? आमाला काका येवडेच. वैनिला घ्याया मी पन आलोया.' चुलत-दिराने पुस्ती जोडली.
 मोठीमायला क्षणभर सुचेना काय उत्तर द्यावं ते. हे नवं संकट समोर उभं राहीलं होतं. 'इचारा बाबा तुमच्या सुनला. येत असंल तर घिऊन जावा. जिकडचं माणूस तिकडे.' मोठीमाय बळेबळे बोलली. तेवढ्यात डोक्यावर पदर घेऊन सुनी बाहेर आली.
 'मोठीमाय, हिरीत ढकलून द्या न्हाई तर रस्त्यात सोडून जा असं मामंजी नि आत्याबाई बोलले होते न तुला? त्या दिशीच हिरीत ढकलून दिलं त्यांनी मला. मला तिकडं जायाचं न्हाई. माझं मायेचं माणूस तर ऱ्हायलं न्हाई, कुणाच्या भरुश्यावर जाऊ तिकडं? कोन हाय माजं तिथं? मला त्यांचं काय बी नगं. मी जानार नाय. सांगून ठिवते!' सुनी धिटाईनं बोलली, आणि आत गेली. मोठीमायने मनातल्या मनात सुस्कारा सोडला, आणि तिने ठरविले की, सुनीच्या म्हणण्याबाहेर जायचे नाही. चारदोन गोष्टी बोलून मोठीमाय आणि तिच्या लेकानं सुनीच्या सासऱ्याला परत पाठवले.
 सोलापूरच्या ताई अधूनमधून घरी येऊन जात, नवनवी पुस्तके देऊन जात. यावेळी त्या आल्या की त्यांच्याशी सुनीच्या शाळेबद्दल बोलायचे, असे मोठीमायने ठरवून टाकले. अडचणी खूप होत्या. एका तरुण विधवेने शाळेत जाणे समाजाला पटणारे नव्हते. सुनीच्या मनावरचा ताण पूर्णपणे ढिलावला नव्हता.

 शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा हिस्सा रमेशच्या आई-वडिलांना हवा होता. या घेऱ्यातून सुनीला बाहेर काढायचे तर या वातावरणातून बाहेर जाणे महत्त्वाचे होते. नळदुर्ग गाव पुणे-हैदराबाद मार्गावर वसलेले. तेथील शाळा चांगली होती. मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापिका बाईशी सोलापूरकर ताई बोलल्या होत्या. सुनीता भूकंपग्रस्त भागातील असल्याचे, तसेच तिच्यावर

सुनिता
८९