पान:तिच्या डायरीची पाने.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आग्रह केला. 'सुने,आमच्या केंद्रावर खूप छान-छान पुस्तकं आहेत, वाचून झालं की तिथे ये नवे बदलून घ्यायला.' ताई आणि अनिशा निघून गेल्या. खूप दिवसांनी सुनीचा चेहरा जरा सैलावला होता. मोठी माय त्यांना दारापाशी सोडून आली. ती जवळ येताच सुनीचा ऊर भरुन आला. तिने मोठीमायला ओढून बाजेवर बसविले आणि तिच्या कुशीत शिरून मोठमोठ्यांदा रडू लागली.
 'मोठीमाय खरंच त्ये पुन्ना दिसणार न्हाईत का ग? फारफार माया लावली ग त्यांनी. लगीन मला नको होतं, पण लई प्रेम केलं ग त्यांनी माज्यावर. मला पुढे बी शिकिवणार होते. बी.ए. करनार होते. कालिज्यात घालणार होते लातूरच्या. तितंच एकादं दुकान टाकू म्हनले होते, समंद… समंद… इस्कटून ग्येलं ग ऽऽ. मोठीमाय मला गच्च धरुन ठेव. काय बी कळंना गं मला ऽऽ.'
 कितीतरी वेळ सुनीता रडत होती. मोठीमाय नातीच्या पाठीवरून हात फिरवीत होती. वहाणारे डोळे आणि नाक पदराने पुशीत होती. आईने तांब्यात पाणी आणले. मोठीमायच्या हातात दिले. मोठीमाय उठली, खळखळ चूळ भरून टाकली. डोळ्यावर पाणी मारले. नातीला उठवीत बोलली, "बेटा, पल्याड ग्येलेलं माणूस कुठं परत येतंय का? त्याला आठवीत रहायचं, नि त्याला जे आवडत व्हतं ते करीत ऱ्हायचं. उट बाय, धू तोंड.'

 त्या दिवसापासून सुनीच्या पायांना, हातांना वेग आला. ती घरात आईला मदत करु लागली. पुस्तकात डोकं खुपसून बसे. कसा वेळ जाई ते कळत नसे. एक दिवस सरकारी माणसं येऊन गेली. सुनीचे नांव नोंदवून गेली. भूकंपात मरण पावलेल्यांच्या अगदी जवळच्यांना सरकार नुकसान भरपाई देणार होते. रक्कम मोठी होती. चारदोन दिवस मध्ये असतील तोच सुनीताचा चुलत दीर आणि सासरा आले. सुनीताला घेऊन जाण्यासाठी. मोठीमाय सामोरी गेली. पाणी दिलं. 'सुनबाईला घेऊन जाया आलाव. तवाच्या दुःखात मंडळींना भान हायलं नाय. घरातली लक्ष्मी माघारी लावली. आता समदी लोकं नावं ठिवाया लागलीता. दुःखी लेकरू पोटाशी धरायचं तर भाजून माघारी लावलं म्हणाया लागलीता. लई पच्चाताप व्हाया लागलाय

८८
तिच्या डायरीची पाने