पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावातल्या गुंडांची नजर तिच्यावर पडणार या कल्पनेने सासू हैराण होई. शेवटी तिने एक दिवस बैलगाडी केली, लोखंडी कॉट, गादी नि शांतू यांना त्यात कोंबून ती थेट लातूरला आली. नवरा आता चांगला थोराड दिसू लागला होता. बाविशी पार केली होती. आईने लेकाला बजावले, "तुझा माल तुझ्या दारात टाकाया आले. लई दिस सांबाळलं मी. आता तू नि तुजी बायको. कायबी करा."
 असे सांगून निघून पण गेली. त्या रात्रीची हकीकत शांतूनं सांगितली ती अशी-
 "भाभी मनाला लई आशा होती. भीती वाटत होती. शिनीमातला परसंग डोळ्यासमोर येई नि लाज वाटे. रातच्याला मी गोडा भात रांधला. वेणी फणी केली, डोळ्यात काजळ घातलं. कुंकवाचं बोट व्हटाला चोपडलं. पन काय सांगू? त्या रात्री लई उशिरा दादाप्पा ढूस पिऊन आला अन मला सोन्याची मुदी काढ म्हणू लागला. मी रडाया लागले तर पलंगाच्या लोखंडी दांडीनं मरूस्तो मारलं मला. नि ढाराढूर झोपून गेला."

 दुसऱ्या दिवशी शांतू उठली. ती थेट सासूच्या दारात उभी राहिली. नंतर दोन वर्ष सासू सुना एकत्र राहात, कमवत, खात. सासूही थकली होती. शवटी एक दिवस सासूनं शांतूला अंबाजोगाईला मोठ्या बहिणीच्या दारात आणून टाकलं. राहीबाईला सांगितले की सांभाळ तुज्या बहिणीला. सासू दोन दिवस राहून पुण्याच्या लेकाकडे निघून गेली. शांतूच्या आयुष्याला नवे वळण लागले. नवऱ्याने मारले तरी मनात त्याच्याविषयी ओढ होती. दोघी बहिणींनी ठरविले की, शांतूने भरपूर काम करून पैसे साठवायचे. सहा माशाची मुदी नि शर्टचा पीस घेऊन नांदायला जायचे. त्यातच पाठक बाईंचे (शाळेतील शिक्षिकेचे) काम मिळाले. शांतू विश्वासाने बाईकडे पैसे जमा करी. बहिणीचा बारदाना मोठा होता. मेहुणा शाळेत चपराशी. पण चोवीस तास दारूत बुडालेला. त्यात पेन्शनला आलेला. दोन मुकी मुलं नि चार बोलकी मुलं. असा आठ जणांचा संसार. "कितीही कष्ट केले तरी मिळकत पुरत नसे. तरीबी दोन वर्षात हजार रुपये साठले. त्यात थोडी पाठकवाईनी भर घातली." बहीण, मेहुणा शांतूला घेऊन लातूरला गेले. बरोबर सोन्याची मुदी होती. शर्टपीस होता. पण तिथे वेगळाच डाव मांडलेला होता. शांतूच्या नवऱ्याच्या घरात दुसरीच बाई त्याची बायको म्हणून उभी होती. ती

शांतू
२५