पान:तिच्या डायरीची पाने.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू


 "बाई, बाहेर या ऽऽ" अशी हाक ऐकून आले. तर दारात पोस्टमन दादा उभे. मनात आले, कुणाचे नॉटपेड पत्र आले? की चक्क धनलाभ?... मनिऑर्डर?
 पोस्टमन हातात कार्ड घेऊन अगदी हसऱ्या उत्सुकतेने माझी वाट पहात होता. मी दिसताच म्हणाला, "बाई, तुमच्या तुमच्या मनोशिनी लेकीचं, दस्तुरखुद्द हातांनी लिहिलेलं पत्र आणलंय. चहाचं इनाम हवं, मुद्दाम शेवटी आलोय इथं."
 हा पोस्टमन माझा विद्यार्थी आहे. हे इनाम थंडीच्या गारठ्यात हक्कानी मागणारच तो! पत्र होते शांतूचे. लोणावळ्याहून आले होते. शांतूच्या अक्षरातले. "शयीला लूया, मनोशिनी, अंबाजोगाई." आणि त्याखाली नवशिक्या विद्यार्थ्याची टीप, 'हे पत्र भाभीजवळ जरूर पोचवणे.' अशी.
 चहा घेऊन पोस्टमन गेला. मला मात्र आनंद लपवता येईना. मीही पत्र हातात घऊन 'मनस्विनी'कडे सुटले.

 शांता आमच्या 'दिलासातली पहिली कन्या.' चौऱ्याऐंशीच्या एप्रिलमध्ये दिलासाची रीतसर सुरवात झाली. दिलासाघर जानेवारीत सुरू झाले तरी त्यात यायला कोणी तयार होईना. घरातून हाकलून दिलेली मुलगी नदीचा डोह जवळ करील, स्वतःला पेटवून घेईल किंवा झाडाला टांगून घेईल. पण एखाद्या संस्थेत जाणे कमीपणाचे वाटत असे. आजही थोडीफार स्थिती तशीच आहे. दिलासा घर सुरू झाल्यावर आम्ही सर्वत्र निरोप दिले होते. गरजू एकाकी स्त्रियांना कायद्याची मोफत मदत देऊ, वकील लावून देऊ. तिला काही नवीन कला शिकवू... वगैरे वगैरे, सारे तपशील भरून, निरोप दिले होते. पण उत्तर साधारणपणे एकच असे "आमच्या गांवात आठ-दहा जणी अशा आहेत हो.

शांतू
२१