पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन पाच एकर जमीन तीही कोरडवाहू. पाऊसबाबा धडपणी आला; तर पहिलं पीक घेऊन गावातील साठ टक्के माणूस पुण्या-मुंबईकडे वा साखर कारखान्याकडे धाव घेई. मग त्यातून होणारे बायका-मुलांचे हाल. हे सारे जवळून पाहिले नि मानवलोकने ठरवले की, स्त्रियांच्यासाठी काम सुरू करायचे. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय कामाची आखणी कशी करणार? मग त्याला सुरुवात झाली. प्रत्येक गावात एखादा आड वा डोह असे. ज्यातील आसरा तरुण सुनांचा बळी घेत. आणि एखादा पिंपळ असे, ज्यावरच्या मुंजाला तरणीताठी बाई बळी म्हणून हवी असे. शिवाय अंगावर चिमणी पडून भाजून मरणाऱ्यांची संख्याही बरीच. हे सारे समजावून घेताना असे मनोमन वाटले की, अडचणीत आलेल्या बाईला दिलासा' देणारे घर लाभले तर आसरा नि मुंजाचा जोर थोडा कमी होईल. १९८३ मध्ये पुणे येथे कार्यालय असलेल्या तेरे डेस होम्स, जर्मनी या संस्थेने निलंग्यात महिला जागृती शिबीर आयोजित केले होते. तिथे माझ्यावर जबाबदारी सोपविली होती ती भारतीय इतिहासातील स्त्री जीवनाचा आढावा घेण्याची. त्यातून या संस्थेशी नाते जुळले. माझ्या मनातली ओढ आणि मानवलोक संस्थेतील शिस्तबद्धता यांची तेरे डेस होम्सच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली.

 आणि आम्ही महिलांसाठी प्रकल्प सुरू करावा असा आग्रह केला. इन्ग्रीड मेंडोसा, उषा आठल्ये यांच्या सहयोगातून 'मनस्विनी' अवतरली. मी त्या काळात महाभारताने भारलेली होते. इरावती कर्व्याचे 'युगान्त', दुर्गाबाई भागवतांचे 'व्यासपर्व', आनंद साधल्यांचे 'हा जय नावाचा इतिहास', याचा अभ्यास सुरू होता. आणि त्या प्रवासातच 'मनस्विनी' भेटली. महर्षी व्यासांनी द्रौपदीचे माणूसपण भामिनी, मनस्विनी, अग्नी कन्ये या शब्दांतून व्यक्त केले होते. त्या सुमारास स्त्रीच्या देहालाच मोजणाऱ्या समाजाचे चित्र रेखाटणारी 'देहस्विनी' ही माझी कथा 'मेनका' मासिकातून प्रकाशित झाली होती. स्त्रीचे केवळ देहस्विनीपण नाकारण्याचा तो एक प्रयत्न होता, आणि त्यातून 'मनस्विनी' चे ऊर्जस्वल व्यक्तिमत्त्व मनात साकारले. हे नांव सर्वानाच भावले, आणि १ एप्रिल १९८४ ला 'मानवलोक' संस्थेचा महिलांसाठी काम करणारा विभाग म्हणून 'मनस्विनी महिला प्रकल्प' ची सुरवात झाली. प्रकल्पाचा आराखडा तयार करणे तसे सोपे

तिच्या डायरीची पाने