पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तत्त्वांवर श्रद्धा ठेवून राष्ट्रप्रेमाची शिकवण देणान्या, लहान मुले व तरुण यावर संस्कार करणाऱ्या राष्ट्र सेवादलाने महाराष्ट्रात हजारो धडपडणारी मुलें निर्माण केली. अनेक घरे सेवादलमय केली. अशाच एका घरात मी वाढले. बाईचे माणूसपण आमच्या घरात स्वयंभूपणे मान्य केलेले होते. राष्ट्र सेवादलाचे भाऊ रानडे धुळ्याच्या घरी नेहमी येत. लहानपणी भाऊंबरोबर खेड्यात जायचा योग आला. सभेला एकही बाई नाही. भाऊ म्हणाले, "महिला नसलेल्या सभेत मी बोलणार नाही." मग झाली सुरू चुळबूल. एखादा तरुण असं काही बोलला असता तर खैर नव्हती. बोलणारा, म्हातारा पांढरे केस नि टक्कलवाला. डोळ्यातून नितांत माया वाहणारी. मग कुणीतरी एका वयस्क बाईला, एका आईला आणून बसवले नि सभा सुरू झाली. तर अशा या वातावरणात वाढताना समाजाकडे कुतुहलाने पाहण्याची नजर आपोआप आली. डॉ. व्दारकादास लोहिया बाराव्या वर्षापासून सेवादल संस्कारांनी भारलेले, घडलेले. पाठीवर मायेचा हात दादांचा ऊर्फ नारायणराव काळदातेंचा आणि श्री. किंबहुने गुरुजी, ग.धो. देशपांडे या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांचा. साथीला जुना सेवादलाचा संच. नव्या दमाच्या परिवर्तनवादी तरुणांची नवी जोड मिळाली आणि अशा पारिवारिक वातावरणातूनच 'मानवलोक' आकाराला आले.

 संस्था सुरू करतानाच मनाशी खूणगाठ बांधली होती की, एकाने संस्थेसाठी पूर्णवेळ द्यायचा. दुसऱ्याने भाकरीची सोय पहायची.. १९७४ ते ८० पर्यंत हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाची एक शाखा म्हणून काम केले… या फांदीला नवी पालवी फुटू लागली. आणि १९८२ ला या फांदीतूनच 'मानवलोक' ऊर्फ मराठवाडा नवनिर्माण लोकायत निर्माण झाले. १९७४ ते ८२ या आठ वर्षात माझे घर मला बांधून ठेवण्याइतके चिमणे राहिले नव्हते. 'मानवलोक'च्या कामात मलाही आस्था होती. हे काम करताना असे लक्षात आले की, भाऊ रानडेंच्या काळातले खेडे अजूनही आहे तसेच होते. स्त्रियांचे जीवन जणू अडथळ्यांची शर्यत. आणि ती त्यांना अगदी नैसर्गिक वाटते. डोंगरभागात काम सुरू केले. तिथे मुलांचे रातांधळेपणाचे प्रमाण ६ टक्के होते. नारू होता, घाण, माशा, डास यांचे थैमान. दरसाली पाच-सहा बायका बाळंतपणात मरत. बाई अडली तर दवाखाना चार कोस दूर. रस्ता नाही. अल्प भूधारकांची संख्या जास्त.