पान:तिच्या डायरीची पाने.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेमके दुपारी, जेव्हा हे दोघे कामावर गेलेले असत. तिसऱ्यांदा चाचा येऊन गेल्यावर मात्र लिलीला परत पाठवण्याचा निर्णय त्या कुटुंबाने घेतला. लिलीच्या मनात मात्र आता वडिलांना...भावाला... बहिणींना भेटण्याची जबरदस्त आकांक्षा निर्माण झाली होती. दिवाळीत पपांना खामगांवला भावाकडे पोचवले. लिलीच्या मनाचा विरंगुळाही संपला होता. पपांचे सारे वक्तशीर करण्यात ती हौसेने बुडून जात असे. पुन्हा एकदा अब्बांना भेटण्याची ओढ मनाला लागली. एक दिवस सकाळी केंद्र संवादिनीचा फोन आला की लिलीला पुण्याला जायचे आहे. तिला अब्बांचा शोध घ्यायचा आहे. आम्ही आमच्या परीने त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले होते. पण शोध लागत नव्हता. तीही आता कंटाळली होती. वयाची तिशी ओलांडलेली तर होतीच. तिने रीतसर विनंतीपत्र लिहून दिले आणि ती पुण्याला गेली.
 सुमारे दोन वर्षानंतर बारामतीच्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकाताई लिलीसह संस्थेत आल्या. त्यांचे बंधू अंबाजोगाईला नोकरीला आहेत. त्या अंबाजोगाईत येणार म्हटल्यावर लिलीनेही आग्रह केला इकडे येण्याचा. मनापासून भेटायला आली. गळा पडून भेटली. इथून गेल्यावर ती चिंचवडच्या स्टेशन मास्तरना भेटली. पण त्यांनी दोन वर्षापूर्वीच हे कुटुंब मध्य प्रदेशातील लहानशा गावी बदलून गेल्याचे सांगितले. इतक्या दूर जाणे शक्य नव्हते. ती पुण्याच्या पोलिस स्टेशनमध्ये गेली. तिथून तिला बारामतीच्या स्वीकारगृहात पाठविण्यात आले. तिथल्या ताईंचा अनुभव आमच्या सारखाच. त्यांनी तिला परिचारिकेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण ती तेथे टिकू शकली नाही. वागायला अत्यंत मायाळू, साधी. बोलण्यात गोडवा. कुणाशीही वाद न घालणारी वा भांडणारी. पण मनाने खूप खूप थकलेली लिली. तिच्या भविष्याची काळजी त्यांनाही लागली. त्यांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला. लिलीने मोकळेपणी सांगितले की ती आता कुणाच्याही घरी काम करणार नाही. तिला संस्थेतच राहायचे आहे. जिथून तिला कोणीही, कधीही काढू शकणार नाही. कुठेही कामाला पाठवले जाणार नाही अशा संस्थेत.

 आणि त्या ताईंनी अशा संस्थेचा शोध घेतला. कदाचित केडगांवच्या रमाबाई महिला अनाथाश्रमान लिली स्थिरावलीही असेल.

रुखसाना
१११