पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"चार बाया दारात उभ्या करीन" असे म्हणणे सोपे होते. पहिल्या पत्नीला रीतसर काडीमोड न देता दुसरी बायको करणे कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गुन्हा होता. त्यासाठी हातकड्याही पडतात. हे सत्य कळल्यावर संदीपान घाबरला. पहिली बायको शालू बऱ्या घरची होती. तिनेही दोनं वर्ष चांगला संसार केला होता. खरं तर तिचीच गोडीने समजून घालायला हवी होती.
 दुसरी बायको केली तर आपला केस कोण वाकडा करणार? असे त्याला वाटे. मित्रही म्हणत, "लेका कर दुसरी बायको. कोन काय म्हनत न्हाई. कायदा कोरटात. मोठ्या शहरात. इथं कोन त्याला मानतंय? कितीक मानसं दुसरी बायकू आणतात. तू काय नवं करतूस व्हय?"

 संदीपान वकिलाला जाऊन भेटला. वकिलाने संदीपानला सल्ला दिला. दुसऱ्या बायकोला पढवा नि ती बहीण आहे असे धट्टावून सांगायला लावा. पुढचे पुन्हा पाहू. पण या गोष्टीला सुधी मुळीच तयार होईना. नोटिसा घेऊन पोलिस येऊ लागले. लपता भुई थोडी झाली. धंद्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागला. या साऱ्या प्रकरणात सर्वात निर्दोष असलेली सोळा वर्षाची सुधी बळी ठरली. घरी नवऱ्याचा मार सुरू झाला. सासू घालून पाडून बोले. जेवायला अर्धीचतकोर भाकर नि लाल तिखट मिळे. जणू घर उलटे फिरले. एक दिवस संदीपान सुधीला आणि तान्ह्या बिंदूला, नितीशला दगडवाडीला, सुधीच्या माहेराला सोडून आला. माहेरी तर अठरा विश्वे दारिद्र्य म्हातारा बाप रोजगार हमीच्या कामावर जाई. भाऊ दुष्काळात मुंबईला गेला. तो तिकडेच होता. बापाला मिळणाऱ्या दहा रुपयात लेकराला दूध कुठून मिळणार? मग सुधीही कामावर जाऊ लागली. 'बराशी' खंदू लागली. महिना निघून गेला. नेकनुराहून येणाऱ्या बातम्यांकडे तिचे कान लागलेले असत. कोणीतरी सांगितले की संदीपानने पहिल्या बायकोला आणि लेकीला आणलेय. समदे आपसात मिटलेय. अलीकडे सुधीबी वैतागून बापावर कडाडे, "म्हातारपनी कशाला जलमाला घातलंस दादा ? दुसरेपनावर देण्यापरीस हिरीत ढकलून द्यायचं व्हतं. मी तर कशी बी जगेल. पन ह्या लहानग्यानं काय पाप केलंय? त्याच्या बिगर मी तरी कशी जगू? नि त्याला कुठून खाऊपिऊ घालू ? शिक्षाण देऊ? मला बी साळंत घातलं न्हाई तुमी. लई मोठं पाप क्येलं दादा तुमी. कुठं फेडाल ?"

सुधामती
९७