पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकांक्षांचे हेलिकॉप्टर

 रोजच्याप्रमाणे आजही डायनिंग टेबलवर वर्तमानपत्र होतं. मी सपत्नीक पहिला चहा घेत होतो. वर्तमानपत्रांत सर्वात वर सैनिकांनी वाचवलेले पूरग्रस्त हेलिकॉप्टरमधून बाहेर पडत असल्याचे हृदयद्रावक छायाचित्र होते. मी व पत्नी आम्ही दोघेही पूरग्रस्तांच्या दुरावस्थेबद्दल कितीतरी वेळ बोलतच राहिलो होतो. आपणास काय करता येईल अशी चर्चा होती. तेवढ्यात मोठी सून आली. तिनं वर्तमानपत्र उचललं नि म्हणाली, “पूरग्रस्तांची मजा आहे नाही? हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळालं." मी सुनेस पूरग्रस्तांचं दुःख समजावत असताना ज्येष्ठ चिरंजीव आले. एखादा शब्द इकडे तिकडे असेल. तोही म्हणाला, “पूरग्रस्त खुश असतील. हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळालं." मी त्याला पूरग्रस्तांची दैना समजावत होतो. तितक्यात कनिष्ठ चिरंजीव आले. वय वर्षे पंचवीस. तोही तसंच काहीसं म्हटला. मला नि माझ्या पत्नीला जे वाटलं ते मुला-सुनेस वाटलं नाही. असं का व्हावं? एक घटनेच्या दोन भिन्न, टोकाच्या प्रतिक्रिया का याव्यात?
 मी विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं... माझी नि माझ्या मुलांची पिढीही स्वातंत्र्यानंतरच जन्मली नि वाढली पण दोन पिढ्यांच्या वाढीची परिस्थिती मात्र भिन्न होती. माझी पिढी वाढत असताना देश गरीब होता, भूकबळी व्हायचे, दुष्काळ पडायचा, धान्य आयात केलं जायचं, रेशनची दुकानं होती, लांबच लांब रांगा असायच्या, पगार तुटपुंजा होता. दारिद्र्य होतं, पण स्वतंत्र देशाचं सुराज्यात रूपांतर करायची जिद्द होती. माझ्या पिढीनं वयाच्या पन्नासाव्या वर्षी समृद्धी अनुभवली. (सन १९९०) ही समृद्धी कष्टसाध्य होती. एक अविकसित देश विकसनशील करत

जाणिवांची आरास/७९