पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोबाईलच्या करामती

 काही साधनं अशी असतात की ती माणसाचं सारं जीवन आमूलाग्र बदलून टाकतात. मागच्या शतकात तार, रेल्वे, रस्ते, टेलिफोन आदी दळणवळणाच्या साधनांनी जगास जवळ आणलं. आज संपर्क साधनांच्या क्रांतीमुळे जगातील अंतरच संपुष्टात आलंय. मोबाईल फोननी, त्याच्या वाढत्या करामतींनी एकीकडे माणसास जवळ आणलं तर दुसरीकडे माणसास त्याचं खासगी आयुष्य विस्तृत करण्याचं जणू वरदानच दिलं असं मला वाटतं. 'तेरी भी चूप और मेरी भी' हे मोबाईलमुळे खरं ठरलं.
 फार पूर्वी नाही, पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी गावात एकच फोन असायचा. तोही पोष्टात. फोन येणार म्हणून माणसं दिवसभर वाट पाहात बसायची. नंतर बँक, शाळा, सोसायटीत फोन आले. हळूहळू ते घरोघरी झाले. ज्याच्या घरी फोन असायचा त्याचा काय भाव असायचा म्हणून सांगू? जावयाला जितकं जपायचे तितकं फोन असलेल्या शेजाऱ्यास! पुढे एस.टी.डी.बुथचा जमाना आला. रात्री अकरानंतर हाफ चार्ज असल्यानं रात्री अकरा ते बारा बूथवर ही गर्दी वेटिंग, क्यू असायचा. मनातल्या मनात शिव्या देत लोक आपला नंबर यावा म्हणून तिष्ठत राहायचे.

 मग मोबाईल फोन आले. पेजर आले. सुरुवातीस माणसं दागिन्यासारखे मोबाईल मिरवायचे. आज भांडीवाली, भाजीवाली, भंगारवाला, गवंडी, मिस्त्री, साऱ्यांकडे मोबाईल आहेत. मोबाईल नाही असा माणूस शोधणे दुर्मीळ!
 या मोबाईलनी सर्वांत मोठी करामत जर काय केली असेल तर ती संवाद-स्वातंत्र्याची! पूर्वी फोनवर क्रॉस कनेक्शन लागायचं. त्यामुळे आपण

जाणिवांची आरास/५९