पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय बोलतो ते ऑपरेटर, क्रॉस कनेक्शन जिथं लागायचं तिथं सगळं ऐकू जायचं. लोक खासगी बोलताना जीव मुठीत धरून बोलायचे. शिवाय कधी-कधी राँग नंबर लागायचे. मग सगळाच घोटाळा. जे झाकायला जावं ते उघडे पडायचं! बोलायची चोरी असायची.
 आता मनमुराद (चोरून!) बोलता येतं. अनेक तासांनी जाऊन आल्यावर जसं हायसं वाटतं, तसं मोबाईलवर बोलताना वाटतं. पूर्वी तासांनी जाऊन आल्यावर लोक फ्रेश, इझी व्हायचे. हल्ली मोबाईल आल्यापासून शाळकरी पोरांपासून ते आजोबापर्यंत सर्व कसे सदासर्वकाळ फ्री, फ्रेश, इझी असतात. सगळ्यांनी ‘कर लो दुनिया मुट्ठी में' म्हणत मुठी आवळल्यात. 'झाकली तर सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची' या एकोणीसाव्या शतकातल्या म्हणीचा अर्थ एकविसाव्या शतकात येऊन खऱ्या अर्थानं उलगडला, सार्थ ठरला. या मोबाईल प्रायव्हसीने माणसास खासगी जीवन जगण्याची मुभा दिली. मोबाईलमुळे माणसाच्या मनावरचे कितीतरी ताणतणाव कमी झाले. मोबाईल आता संपर्काचं साधन न राहता ते मनोरंजन, मजा, करामती, मस्करीचं साधन होऊन गेलंय. कुणालाही टोपी घालावी, कुणालाही नाचवावं, कुणालाही काहीही बोलावं, लिहावं अशा अराजकापर्यंत गेलेल्या मोबाइल प्रायव्हसींनी शास्त्रज्ञांपुढे माणसाच्या मेंदूच्या दुरूपयोगावर नियंत्रण आणण्याचं आव्हान उभं केलंय!

***

जाणिवांची आरास/६०