पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपला आदर्श दुस-याकडून पाळला जावा, अशी आपली अपेक्षा असते. आपण स्वतः कोरडा पाषाण. आपल्यासारखे स्थितिस्थापक आपणच. सिंगापूरला गेलो की शिस्तबद्ध, मुंबईत पाऊल ठेवताच मूळ भारतीय. स्वच्छता दुस-याने पाळावी. आपण सालं, कपटे, कचरा, बडके गुपचूप टाकतो. ते 'चलता है' म्हणून. कर भरणे हा आपणास तोटा वाटतो. चुकवणे म्हणजे मिळवणे हे आपले जीवन तत्त्वज्ञान व ध्येयही!
 कामात कुचराई आपल्या दृष्टीने क्षम्य; पण दुस-याने केली की, आपण तडक फाशीची भाषा वापरतो. स्वजातीचा वृथा अभिमान व परजातीची असूया आपल्यात मुरलेलीच म्हणायची. तीच गोष्ट धर्माची. दया, क्षमा, शांती म्हणजे बुळेपणा आणि अरेरावी, दांडगाई म्हणजे पुरुषार्थ, असे आपण मानतो. मी म्हणजे कोण, दुसरा ‘किस झाड की पत्ती!' वाचाळता आपला स्थायिभाव. कृतिशीलता अपवादाने! आपण दाखवतो। तसे नसतो. जे असतो ते जगास दिसत नाही म्हणून बरे! ‘एकमेकां साह्य करू' आपणास तोंडपाठ असते. पण अपघात दिसताच आपण पळ काढतो. खरे संवेदनशीलच मदतशील असतात. जिवाभावचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात. शिक्षित आत्मकेंद्री, स्वार्थी अधिक.
 आता पुरुषाने बाळाला जन्म दिला म्हणजे निसर्गचक्र बदलले हे नक्की झालं. निसर्ग हरला, माणूस जिंकला! आता कोणताही शोध लागणे सहज शक्य. म्हणजे असे की, आपल्या मनात काय आहे ते पडद्यावर दिसू शकेल. मनात आणायचा अवकाश! पण काही गोष्टी अशक्य नसल्या तरी अवघड होत जातील. म्हणजे माणूस सत्शील राहणे, सदाचारी होणे, बुद्धिप्रमाण वागणे, दैववादी न होणे, विवेक व विज्ञानाच्या कसोटीवर जगणे आदी. त्या सर्व गोष्टी सोप्या नि सहज करायचा एकच उपाय आहे. जे विधायक, हितकारी, वैध आहे असे आपण शिकतो, जाणतो ते आचरणात आणू. दुसरा काय करतो, याचा विचार न करता आपले आचरण दुसन्यास अनुकरणीय वाटावे, असे वागू. आपल्या नैतिक कसोटीवर दृढ राह. पहा, एक दिवस असा येईल, लोक म्हणतील, अरे सत्ययुग आले तर. आपली जन्मभूमी स्वर्ग झाल्याचा आनंद मिळवायचा असेल तर स्वतःच सत्यवान झाले पाहिजे नि सावित्रीपण!

जाणिवांची आरास/१६६