देवाने आणले असे आपले मला वाटते. जमले तर करावे ना? का नको इतक्यात ?"
" आता काही तशी लहान नाही चित्रा, तिला सारे समजते. कशाला लांबवा ? वेळीच सारे बरे असे मला वाटते. उगीच लांबविण्यात अर्थ नाही." सीताबाई म्हणाल्या.
पुढे काही दिवसांनी बळवंतरावांनी जहागीरदारांना खरेच विचारले.
"तुमचा चारू तयार आहे ना ?" बळवंतरावांनी प्रश्न केला.
“तो तयार आहे. कारण आपल्या आईजवळ तो तसे बोलला. करीन लग्न तर चित्रेशीच, असे त्याने सांगितले." जहागीरदार म्हणाले.
" तुम्हालाही पसंत आहे ना ? "
"अहो, अशी नक्षत्रासारखी मुलगी कोणाला सून म्हणून आवडणार नाही ? चारूच्या आईचीच जरा समजूत घातली पाहिजे."
"तुम्हाला हुंडा हवा असेल तितका देईन. एकदा माझ्या चित्राला चारू वर मिळो हीच इच्छा."
"अहो, हंडा नकोच, आम्हाला का काही कमी आहे! आणि चारूने हुंडा घ्यायचा नाही ही गोष्ट मला कधीच सांगितली आहे. हुंडा घेईन तर चारू पळून जाईल, तुम्हाला काय द्यायचे ते तुम्ही प्रसन्नपणे चारूला व चित्राला द्या. रावसाहेब, माझे खरोखर भाग्य, की तुमच्यासारख्या सज्जनांशी संबंध जोडण्याची संधी मिळाली. मी चारूच्या आईची समजूत घालीन. आपण ठरवून टाकू. समजून चला, की ठरले असे." जहागीरदार म्हणाले.
चित्राच्या लग्नाच्या गोष्टी सर्वत्र पसरल्या. ती आता शाळेत जाईना. . मुले मोठ्याने बोलून चिडवीत. ती घरीच वाची. घरीच राही.
तिकडे चारूच्या आईची समजूत घालणे चालले होते.
"मला काही ही मुलगी पसंत नाही. चारू, तू लहान होतास तेव्हापासून माझ्या मैत्रिणीला मी सांगितलेल आहे, की तुला मुलगी झाली तर माझ्या चारूला करीन. का रे नाही ती तुला पसंत ? " चारूच्या आईने विचारले.
" मला ती नको वाटते." चारू म्हणाला.