"तुमची आई तुमच्या लग्नाची खटपट करीत नाही का ? मला माहीत आहे."
"परंतु तुमचे नाव काय ?"
"सांगूच ? "
"सांगा."
"हस्त नक्षत्राच्या पुढे कोणते नक्षत्र येते ? "
"माझी परीक्षा घेता वाटते ? "
"हो."
"उत्तरा ना?"
"अहो, हस्त नक्षत्राच्या पाठीमागचे नाही ! हिन्दुस्थानला पाठीमागे नाही जायचे, पुढे जायचे आहे !"
" उत्तरा, हस्त, चित्रा,...."
"तुमचे नाव चित्रा ? "
"होय."
" छान आहे नाव. रवींद्रनाथांच्या एका काव्यमय नाटकाचे नाव चित्रा आहे."
" तुम्ही आता जा तिकडे. माझा गुच्छ नाही तर तसाच राहील."
चारू निघून गेला. चित्रेने त्याच्याकडे पाहिले. तिने सुंदर गुच्छ तयार केला आणि ती बंगलीत परत आली.
"चित्रा, कोठे होतीस हिंडत ? " बळवंतरावांनी विचारले.
" होत्ये फुलांच्या संगतीत." ती म्हणाली.
"गालांची फुले झाली आहेत. उन्हात इतक्या वेळ का राहायचे ? "
"बाबा, लागू दे की एखादे वेळेस थोडे ऊन ! "
"तुला भूक लागली आहे का ? ही बघ फळे आहेत. आम्ही खाल्ली. तुला ठेवली आहेत."
"मी का आता एकटीच खाऊ ? "
" आमचा चारू पण खाईल, त्यानेच चिरून आणली. परंतु खाल्ली नसतील. चारू, अरे चारू...." जहागीरदारांनी हाक मारली.